नाशिक : पुढारी वृत्तसेवा; अल्प पर्जन्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भयावह होत आहे. जिल्हा प्रशासनाने घोषित केलेल्या हंगामी पीक पैसेवारीमध्ये तब्बल १ हजार ८८ गावे ५० पैशांच्या आत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे, तर ८७४ गावांची पैसेवारी 50 पैशांहून अधिक आहे. त्यामुळे येत्या काळात ५० पैशांहून कमी पैसेवारी असलेल्या गावांमध्ये दुष्काळाच्या उपाययोजना तातडीने घेण्याची गरज आहे. (Nashik Drought News)
चालू वर्षी अल निनोमुळे मान्सूनने जिल्ह्याकडे पाठ फिरवली. वार्षिक सरासरीच्या ४० टक्क्यांच्या आसपास पर्जन्य तूट आहे. त्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळाचे चटके साेसावे लागत आहेत. शासनाने मालेगाव, येवला व सिन्नरसह तब्बल ५६ महसुली मंडळांमध्ये आधीच दुष्काळ घोषित केला आहे. त्यातच जिल्हा प्रशासनाने केलेल्या पीक पाहणीत जिल्ह्यातील दुष्काळाची भयावह परिस्थिती समोर आली आहे.
जिल्हा प्रशासनाने २०२३-२४ ची खरीप आणि रब्बी पिकांची जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर केली आहे. या यादीत एकूण एक हजार ९६२ गावांच्या पाहणीत तब्बल एक हजार ९९ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत असल्याचे समोर आले, तर ८७४ गावे ही ५० पैशांवर आहेत. प्रशासनाकडून आता पैसेवारीचा अहवाल राज्य शासनाला सादर होणार आहे. यापूर्वी दुष्काळ घोषित झालेल्या तालुके व मंडळांप्रमाणे ५० पैशांच्या आत पैसेवारी असलेल्या गावांनाही एनडीआरएफच्या नियमानुसार मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (Nashik Drought News)
जिल्ह्याचा पैसेवारीचा आढावा
ए्कूण गावे : १,९६२
खरीप गावे : १,६७९
रब्बी गावे : २८३
५० पैशांआतील एकूण गावे : १,०८८
५० पैशांवरील एकूण गावे : ८७४
५० पैशांआतील खरीप गावे : ९३४
५० पैशांवरील खरीप गावे : ७४५
५० पैशांआतील रब्बी गावे : १५४
५० पैशांवरील रब्बी गावे : १२९
तालुका | खरीप | रब्बी | |
---|---|---|---|
नाशिक | 0 | 0 | |
दिंडोरी | 0 | 0 | |
इगतपुरी | 0 | 0 | |
पेठ | 0 | 0 | |
त्र्यंबकेश्वर | 0 | 0 | |
निफाड | 60 | 75 | |
येवला | 83 | 41 | |
सिन्नर | 110 | 18 | |
मालेगाव | 151 | 0 | |
नांदगाव | 95 | 5 | |
चांदवड | 103 | 9 | |
कळवण | 115 | 6 | |
बागलाण | 171 | 0 | |
देवळा | 46 | 0 | |
सुरगाणा | 0 | 0 | |
एकूण | 934 | 154 |
——-०——–
हेही वाचा :