मुंबई, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त झाल्या असून त्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की विनोद तावडेेंना रिंगणात उतरवणार याबाबत भाजपमध्ये खल सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र उमेदवारीचा निर्णय केंद्रीय नेतृत्वच घेणार असल्याने श्रेष्ठींकडे भूमिका मांडण्याचे आश्वासन राणेंना फडणवीसांनी दिल्याचे समजते.
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशावर आक्षेप घेत जाहीर भूमिका मांडण्याचे ठरविले होते. फडणवीस यांनी फोन करून राणे यांना तुम्ही अशी जाहीर भूमिका मांडू नका, अशी विनंती केली होती. या मुद्द्यावर उभय नेत्यांत चर्चा झाली. त्याचबरोबर राज्यसभेची निवडणूक 28 फेब्रुवारी रोजी होत आहे. मुदत संपलेल्यांमध्ये राणे हे स्वत: असल्याने ते पुन्हा राज्यसभेसाठी इच्छुक आहेत.
राणे आणि तावडे कोकणातील आहेत. बिहारमध्ये भाजपमध्ये नितीशकुमार आल्यामुळे भाजपमध्ये तावडेेंचे वजन वाढले आहे. या पार्श्वभूमीवर राणेंनी भूमिका मांडल्याचे समजते.
महायुतीकडे 194 मते
नारायण राणे, कुमार केतकर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, अनिल देसाई, वंदना चव्हाण या महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या सदस्यांची मुदत संपत आहे. सध्या महायुतीकडे सर्वात जास्त मते आहेत. भाजपची 105, शिंदे गट 50 आणि अजित पवार गट 44 अशी जवळपास 194 मते महायुतीकडे आहेत. या गणितामध्ये महायुतीचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. भाजपकडून नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे इच्छुक आहेत. शिंदे गटाकडून मिलिंद देवरा इच्छुक आहेत. अजित पवार गटाकडून पार्थ पवार, सुनील तटकरे ही नावे चर्चेत आहेत.