पुढारी ऑनलाईन डेस्क : ind vs aus 2nd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संघ काल (दि. 17) पहिल्या दिवशी पहिल्या डावात 263 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने 7 गमावून 62 षटकांत 179 धावा केल्या आहेत. केएल राहुल 17, तर त्यानंतर रोहित शर्मा 32, पुजारा 0, श्रेयस अय्यर 4, रविंद्र जडेजा 26, विराट कोहली 44, केएस भरत 6 धावांवर बाद झाले. सध्या आर अश्विन आणि अक्षर पटेल क्रिजवर आहेत.
लंच नंतर भारताला सलग दोन धक्के बसले. 50 व्या षटकामध्ये 135 धावांवर भारताला सहावा धक्का बसला. 44 धावांवर खेळत असलेल्या विराट कोहलीला कुहनेमन याने पायचीत केले. यानंतर 51 व्या षटकामध्ये नॅथन लायनने 12 धावांवर खेळणार्या श्रीकर भरतला बाद केले. त्याने स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेल दिला. यासह लायनने भारताविरुद्ध 100 बळी पूर्ण केले आहेत.
भारताचा निम्मा संघ 125 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. रवींद्र जडेजा 74 चेंडूत 26 धावा बाद झाला. तो टॉड मर्फीच्या फिरकीत अडकला आणि 46.5 व्या षटकात एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. जडेजा आणि कोहलीने 59 धावांची भागीदारी केली.
विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या जोडीने भारतीय डावाची धुरा सांभाळत अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान, कोहली थोड्या वेगाने धावा करताना दिसला. 45 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 बाद 120 होती.
भारताला 66 धावसंख्येवर चौथा धक्का बसला. श्रेयस अय्यर 4 धावा काढून माघारी परतला. नॅथन लायन वैयक्तीक आणि संघासाठी चौथे यश मिळवून बळींचा चौकार मारला. पीटर हँड्सकॉम्बने अय्यरचा झले पकडला. अय्यरने 15 चेंडूचा सामना केला. लायनच्या फिरकीसमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचे दिसत आहे. भारताला सामन्यात टिकण्यासाठी मोठ्या भागीदारीची गरज आहे. आता विराट कोहली आणि रवींद्र जडेजा ही जोडी पुढे काय करेल याकडे लक्ष लागले आहे.
54 धावांवर भारताची तिसरी विकेट पडली. चेतेश्वर पुजाराला आपल्या 100व्या कसोटीतील पहिल्या डावात खातेही उघडता आले नाही. नॅथन लायनने त्याला पायचीत केले. पुजाराने एकूण सात चेंडूंचा सामना केला. लायनने एकाच षटकात दोन विकेट घेत टीम इंडियाला बॅकफूटवर ढकलले. आता या सामन्यावर पकड मिळवण्यासाठी टीम इंडियाला संघर्ष करावा लागणार आहे. श्रेयस आणि विराटला मोठी भागीदारी करतील का हे पहावे लागेल.
भारताने एक विकेट गमावून 50 धावा केल्या. पण 53 धावसंख्येवर संघाला दुसरा झटका बसला. कर्णधार रोहित शर्मा 69 चेंडूत 32 धावा करून बाद झाला. नॅथन लायनने त्याला क्लीन बोल्ड केले. दोन्ही सलामीवीर स्वस्तात गमावल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला.
भारताला पहिला धक्का 46 धावांवर बसला. 17.1 व्या षटकात लोकेश राहुल 41 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. नॅथन लायनने त्याला पायचीत केले. मैदानी पंचाने आपला निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूने दिला. त्यानंतर राहुलने रिव्ह्यू घेऊन स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण रिप्लेमध्ये चेंडू स्टंपवर आदळला असल्याचे उघड झाले. अखेर तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्यण काम ठेवत भारतीय फलंदाजाला बाद ठरवले.
14 व्या षटकात कुहनेमनने केएल राहुलला एलबीडब्यू केल्याचे अपील केले. पण पंचांनी फलंदाज नाबाद असल्याचा निर्णय दिला. यानंतर ऑस्ट्रेलियाने रिव्ह्यू घेतला. तिस-या पंचांनी रिप्लेच्या सहायाने राहुल बाद आहे की नाही हे तपासले. यात राहुल नाबाद असल्याचे समोर आले आणि तिस-या पंचांनी मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर केएल राहुलने पलटवार करत गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार ठोकला.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे दिल्ली कसोटीतून बाहेर पडला आहे. वॉर्नरच्या जागी मॅट रेनशॉ याचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 10 व्या षटकात सिराजचा चेंडू वॉर्नरच्या डोक्याला लागला होता. पण यानंतरही वॉर्नर खेळत राहिला, पण क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उतरला नाही. तो तंदुरुस्त नसल्याचे समोर आले आहे. अशा स्थितीत रेनशॉचा संघात कंकशन सबस्टिट्यूट म्हणून समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने 81 धावा केल्या. पीटर हँड्सकॉम्ब 72 धावा करून नाबाद राहिला. भारताकडून मोहम्मद शमीने 4 बळी घेतले. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी तीन बळी मिळवले.