Latest

Murder : कचरा टाकल्याच्या कारणावरून नांदेडात दोन सख्ख्या भावांचा खून

अमृता चौगुले

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नालीत कचरा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून भावकीतील दोन कुटुंबांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने दोन सख्ख्या भावांचा खून (Murder) झाल्याची घटना देगावचाळ येथे मंगळवारी रात्री घडली. या हाणामारीत अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाजीविक्रेते दिगंबरराव वामनराव राजभोज हे आपल्या कुटुंबीयासह देगावचाळ येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारी राजभोज यांचे भाऊ मधुकर राजभोज राहतात. रात्री घरासमोरच्या नालीत कचरा टाकण्याच्या कारणावरून दोन कुटुंबीयांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. (Murder)

यावेळी प्रफुल्ल दिगंबर राजभोज (35) आणि संतोष दिगंबर राजभोज (33) यांच्या पोटात आणि बरगडीत चाकूने वार करण्यात आला. यातच दोघांचा मृत्यू झाला. संदीप दिगंबर राजभोज (27) आणि राहुल संजय धोंगडे गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिगंबर राजभोज यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात खुनाचा (Murder) गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक चंद्रसेन देशमुख, पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी भेट देऊन उर्वरित आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

SCROLL FOR NEXT