Latest

मुंबई-सिंधुदुर्ग सहापदरी ग्रीनफिल्ड महामार्गाचे टप्पे निश्चित

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्गदरम्यान सहापदरी ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या महामार्गासाठी चार टप्प्यांतील एकूण 388.45 किलोमीटर मार्गाच्या अंतिम आखणीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ताशी शंभर किलोमीटर वेगाने प्रवास करता येईल, अशा या महामार्गासाठी शंभर मीटर रुंद भूसंपादनालाही मान्यता देण्यात आली आहे.

रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा मुंबई ते सिंधुदुर्ग असा ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. तत्कालीन नगरविकासमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 मार्च 2020 रोजी विधिमंडळात यासंदर्भातील घोषणा केली होती. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात 'एमएसआरडीसी'ची या महामार्गासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानुसार 'एमएसआरडीसी'ने या महामार्गासाठी विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करून चार टप्प्यांतील अंतिम आखणी प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला. त्यानुसार प्रवेश नियंत्रित सहापदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग बांधणे, 100 कि.मी. प्रतितास वेगासाठी महामार्ग संकल्पित करणे, महामार्गासाठी 100 मीटर रुंद भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या महामार्गामुळे कोकणातील उद्योगवाढीस चालना मिळून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच हा महामार्ग नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळास जोडला जाणार असल्याने कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास सोयीचा होणार आहे. तसेच या मार्गाची आखणी कोकणपट्टीच्या किनार्‍याजवळून करण्यात येणार असल्याने या मार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना कोकणचे निसर्गसौंदर्य पाहता येईल, असा दावा या ग्रीनफिल्ड महामार्गाची घोषणा करताना करण्यात आला होता.

या चार टप्प्यांत होणार बांधकाम

  • पेण (बलवली गाव) ते रायगड/रत्नागिरी जिल्हा सीमा : 95.40 कि.मी.
  • रायगड/रत्नागिरी जिल्हा सीमा ते गुहागर-चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) : 69.49 कि.मी.
  • गुहागर-चिपळूण (रत्नागिरी जिल्हा) ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सीमा : 122.81 कि.मी.
  • रत्नागिरी/सिंधुदुर्ग जिल्हा सीमा ते पत्रादेवी महाराष्ट्र/गोवा राज्य सीमा : 100.84 कि.मी.

एकूण 388.45 कि.मी.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT