पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. दरम्यान, येथील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये बाचाबाचीनंतर राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या प्रकरणात शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. (Mumbai News)
या प्रकरणात ५० ते ६० अज्ञातांविरूद्धात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आयपीसी आणि बॉम्बे पोलिस ॲक्टनुसार या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येणार आहे, असे देखील शिवाजी पार्क पोलिसांनी स्पष्ट केले आहे. (Mumbai News)
दरवर्षीप्रमाणे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी स्मृती स्थळावर जाऊन मी दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आले नव्हते, मात्र मी निघाल्यावर तिथे उबाठा गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब तिथे आले आणि आमच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. तसेच महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरले. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नसून यांच्या स्मृतिदिनी विनाकारण अशांतता निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.