पुणे, पुढारी वृत्तसेवा : मान्सूनने पुन्हा चकवा दिला आहे. मोसमी वार्यांची गती पुन्हा मंदावली आहे. तळकोकणातून मुंबई, पुण्याकडे मान्सून वाटचाल करणार, असा अंदाज असताना चक्रीवादळाने मान्सूनचा प्रवास रोखून धरल्याने बळीराजासह सर्वांचीच चिंता वाढली आहे. मोसमी वार्यांच्या सध्याच्या धीम्या गतीवरून राज्यात 23 जूननंतरच त्याची वाटचाल सुरू होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मात्र, त्यासाठी बंगालच्या उपसागरासह केरळपासून ते दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यासह पोषक स्थिती निर्माण होण्याची आवश्यकता आहे. राज्यात 30 जूनपर्यंत पाऊस कमीच राहणार असून, 15 ते 20 जुलैपासून पाऊस वाढेल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे हवामानशास्त्रप्रमुख अनुपम कश्यपि यांनी दिली.
बिपरजॉय चक्रीवादळाची 18 जूनपासून तीव्रता कमी होऊन त्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. सध्या या चक्रीवादळाचे अतितीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झाले आहे. सध्या वादळ गुजरात, दक्षिण-पूर्व राजस्थान आणि पूर्व पाकिस्तानच्या दरम्यान समुद्रात आहे.
या चक्रीवादळाच्या वार्यांचा वेग ताशी 55 ते 65 किलोमीटरच्या आसपास असावा, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. 19 ते 22 जूनच्या दरम्यान मान्सूनची वाटचाल होईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
विदर्भ, मराठवाड्यात उकाडा
राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबर पाऊस हजेरी लावणार आहे. त्यातही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस पडणार आहे. तर कोकणात काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून विदर्भ वगळता उर्वरित भागांतील कमाल तापमानाचा पारा कमी झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
मेघगर्जनेसह काही भागांत पावसाची शक्यता
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्याच्या काही भागांत 22 जूनपर्यंत विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका पाऊस पडेल.