Latest

लोकसभा निवडणुकीत अस्तित्व टिकवण्यासाठी ‘स्वाभिमानी संघटने’चा आंदोलनाचा आटापिटा

Arun Patil

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रासह नजीकच्या कर्नाटक राज्यात साखर कारखाने सुरू असताना स्वाभिमानीचे आंदोलन हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील केवळ पाच साखर कारखान्याभोवतीच घोंघावत आहे. महाराष्ट्रात अधिक दर मिळत असतानाही कमी दर देणार्‍या कर्नाटकात ऊस पाठवा म्हणून सांगत शेतकर्‍यांची दिशाभूल केली जात आहे. यातून केवळ स्वार्थाचे राजकारण सुरू असून लोकसभा निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आटापिटा केला जात असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला.

मागील हंगामातील 400 रुपये आणि चालू हंगामात पहिला हप्ता 3500 रुपये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन सुरू केले. त्याचा समाचार घेताना आ. आवाडे म्हणाले, महाराष्ट्रातील साखर कारखान्यापेक्षा कर्नाटकातील कारखाने 200 ते 300 रुपये कमी दर देत आहेत. असे असतानाही स्वत:ला शेतकर्‍यांचे कैवारी म्हणणारे नेते कर्नाटकात ऊस पाठवा म्हणून सांगत शेतकर्‍यांचे नुकसान करत आहेत. महाराष्ट्रात एकरकमी एफआरपी दिली जाते तर कर्नाटकात ती तीन टप्प्यात मिळते. याची सर्वंकष माहिती असतानाही केवळ दत्त, गुरुदत्त, शरद, जवाहर आणि पंचगंगा या कारखान्यांना वेठीस धरुन आंदोलन केले जात आहे.

शेतकरी स्वत:हून ऊस पाठविण्यास तयार असताना आंदोलनाच्या नावाखाली त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. आपणच शेतकर्‍यांचे हितचिंतक आहोत, असे भासवत आंदोलनाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी स्वार्थ साधला जात आहे. आंदोलनाऐवजी शेतकरी बांधवांनी वेळीच योग्य तो विचार करून ज्या कारखान्याला ऊस नोंद केला आहे किंवा ज्या कारखान्याला पाठवायचा असेल तेथे खुशाल पाठवावा, असे आवाहन आ. आवाडे यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT