Latest

अंबाजोगाई : रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थीनीची आत्महत्या, संशयीत आरोपी फरार

रणजित गायकवाड

अंबाजोगाई (बीड) : पुढारी वृत्तसेवा : बारावीच्या वर्गात शिकणार्‍या अल्पवयीन विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि. 10) अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली होती. दरम्यान, गावातील एका रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यानंतर त्या रोडरोमिओवर गुन्हा नोंदवण्यात आला. दिपाली रमेश लव्हारे (वय 17) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून तिने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती. दिपालीचे वडील राज्य परिवहन मंडळात चालक असून ते सध्या पालघर येथे कार्यरत आहेत.

दिपालीची आई सुमित्रा यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घराशेजारी राहणारा अकबर बबन शेख हा तरुण मागील काही दिवसापासून दिपाली कॉम्प्युटर क्लासला जात-येत असताना तिला छेडत होता. रस्त्यात अडवून वेडेवाकडे बोलणे अशा पद्धतीने तो तिला त्रास देत होता. याबाबत दिपालीने आईला सांगितले होते. शुक्रवारी ( दि. 6) दिपालीच्या वडिलांनी अकबरला बोलावून घेऊन तिला त्रास न देण्याबद्दल बजावले होते. परंतु, त्याच्या वागण्यात फरक पडला नाही. त्याचे त्रास देणे सुरु असल्याचे दिपालीने आईला सांगितले होते.

त्यावर वडील आणि भाऊ आला की आपण मार्ग काढू अशी आईने तिची समजूत घातली. परंतु, मंगळवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आई गावातील जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला गेली असल्याने घरात कोणी नसताना दिपालीने घराच्या माळवदाच्या आडुला साडीने गळफास घेतला. रात्री 11 वाजताच्या सुमारास आई घरी परतल्यानंतर ही घटना उघडकीस आली. नातेवाईकांच्या मदतीने दिपालीला स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

मृत मुलीच्या फिर्यादीवरून अकबर बबन शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही. पुढील तपास बर्दापूर पोलीस करत आहेत.

SCROLL FOR NEXT