कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : वैशाख वणव्याचा जबर तडाखा कोल्हापुरात बसत आहे. सूर्य अक्षरशः आग ओकू लागल्याने एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात कोल्हापूरचे कमाल तापमान तब्बल 40.2 अंशांवर पोहोचले आहे. शुक्रवारी दैनंदिन कमाल तापमानात 3.6 अंशांची वाढ झाली. यामुळे उन्हाचा जबर तडाखा कोल्हापूरकरांना सहन करावा लागला. याशिवाय कमाल तापमानही 24.8 अंशांवर असल्याने सायंकाळनंतरही तीव्र उकाडा जाणवत आहे.
गेल्या आठवडाभरापासून तापमानात वाढ होत आहे. शुक्रवारी पारा 40.2 अंशांवर गेल्याने दुपारी कमालीचा उकाडा जाणवत होता. उन्हाची तीव्रता इतकी होती की, रस्त्यांमधून गरम झळा येत होत्या. यामुळे दुपारी शहरातील प्रमुख मार्ग निर्मनुष्य झाले होते. शनिवारी (दि. 6) तापमानात वाढ होण्याची शक्यता असून बुधवारी (दि. 10) व गुरुवारी (दि. 11) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अशी होत गेली तापमानात वाढ
12 मार्चला पारा 37.7 अंशावर होता. त्यानंतर तापमानात किंचित घट झाल्याने पारा 35 ते 36 अंशाच्या घरात होता. मात्र 24 मार्चपासून पारा पुन्हा 37.5 ते 37.7 अंशाच्या घरात होता. 1 एप्रिलपासून दररोज कमाल तापमानात वाढ हो असून पारा 38.5 अंशावरून 40 अंशावर गेला आहे.