Latest

सत्तेतील मराठा नेत्यांनीच आरक्षणाचे गांभीर्य दाखवले नाही : मनोज जरांगे

दिनेश चोरगे

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजावर गेल्या चाळीस वर्षांपासून अन्याय होत असून, ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे आजपर्यंत आरक्षण मिळाले नाही. इतक्या वर्षांत मराठा समाजातील अनेक नेते मंत्री, मुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांनी आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेतला नाही. इतरांना आरक्षण दिले. परंतु, मराठ्यांना दिले नाही. या नेत्यांनीच मराठा समाजाचे वाटोळे केल्याचा आरोप मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि.8) पत्रकार परिषदेत केला. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही, तर कोणामुळे आरक्षण मिळाले नाही त्यांची नावे समोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

जरांगे-पाटील म्हणाले, ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत, त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देताना आम्हाला मिळाल्या पाहिजे. मराठा आरक्षण घेताना त्यात राजकीय आरक्षण घ्यायचे की नाही, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आमचे जे काही हक्काचे आहे ते आम्हाला मिळणारच. आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी असल्याने ओबीसीचे सर्व हक्क आम्हाला मिळणारच आहेत. पुरावे असूनदेखील गेली 40 वर्षे मराठे आरक्षणापासून वंचित राहिले. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही.

फडणवीस जीआर घेऊन आल्यास आनंद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार असल्याच्या प्रश्नावर बोलताना जरांगे म्हणाले की, आम्ही कामाला लागलो असून, आरक्षण मिळवून राहणारच आहे. कोणी भेटायला यावे किंवा नाही हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मात्र, फडणवीस भेटायला आले तर त्यांनी आरक्षणाचा जीआर घेऊनच यावे. आम्हाला आनंदच होईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT