पुढारी ऑनलाइन डेस्क : Mann Ki Baat :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशवासीयांना संबोधित केले. मन की बात या कार्यक्रमाचा हा 103 वा भाग होता. या कार्यक्रमात दरवेळी प्रमाणे देशभरातील अनेक अनोख्या गोष्टींचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. अध्यात्म, भक्ती, पर्यावरण, कलाकारांच्या कार्याचे कौतुक, हज यात्रा इत्यादींविषयी महत्वपूर्ण घटना व्यक्तींबाबत सांगितले. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात गेल्या वेळी आपण हर घर तिरंगा अभियान राबविले होते. यावर्षी देखील आपण हे अभियान राबविणार आहोत. गेल्या वर्षीप्रमाणेच प्रत्येकाने यावर्षी देखील उत्स्फूर्तपणे या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील एका प्रसंगावर चित्रित केलेल्या पेंटिंगचा उल्लेख केला. जाणून घेऊया नेमके काय म्हणाले ते आणि काय आहे या पेंटिंगमध्ये…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशातील कानाकोपऱ्यातील विविध कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कलेतून देशातील उच्च संस्कृतीचे दर्शन घडवतात असे म्हणत त्यांचे कौतुक केले. यामध्ये देवभूमी उत्तराखंडच्या महिला कलाकार, उज्जैनचे कलाकार, राजकोट य़ेथील कलाकार आणि तामिळनाडूतील कलाकारांच्या पेंटिंगबद्दल उल्लेख करत त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. यामध्ये राजकोट येथील एका कलाकाराने काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील प्रसंगावर काढलेल्या पेंटिंगचा विशेष उल्लेख केला आहे.
मन की बातमध्ये कलाकारांच्या कलाकृतीविषयी बोलताना पंतप्रधान यांनी राजकोट येथील एका प्रभातसिंग या कलाकाराच्या पेंटिंगचा विशेष उल्लेख केला. त्यांनी आपल्या पेंटिंगमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर कुलस्वामिनी श्री तुळजा भवानी देवीच्या दर्शनासाठी जात असतानाच्या घडलेल्या प्रसंगाचे चित्रण केले आहे. या पेंटिंगमध्ये प्रभात यांनी त्यावेळी काय वातावरण होते. याचे खूपच सुंदर दृश्यांचे चित्रण केले आहे. चित्राच्या माध्यमातून त्या काळचे वातावरण उभे राहते.
पंतप्रधान पुढे म्हणाले, आपल्या समृद्ध परंपरा टिकवण्यासाठी आपल्याला त्या परंपरा जगाव्या लागतात. त्यांचे जतन करावे लागते. ते एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवाव्या लागतात, शिकवावे लागते. मला आनंद आहे की कलेच्या माध्यमातून तो वारसा पुढे जात आहे आणि त्या दिशेने प्रयत्न करण्यात येत आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या देवभूमितील एका छोट्याशा गावातील महिलांनी भूर्ज पत्रावरील पाठवलेले चित्र आज त्यांच्या चरितार्थाचे साधन कसे बनले याविषयी माहिती दिली. तर उज्जैनचे अनेक कलाकार पुराणांमधील प्रसंगांच्या पेंटिंगचे निर्माण करत आहेत. पुढे त्रिवेणी संगम येथील म्युझियममध्ये ते तुम्हाला पाहता येईल, असेही ते म्हणाले. तर जैवविविधतेच्या क्षेत्रात तामिळनाडू येथील राघवन यांनी दुर्मिळ होत जाणाऱ्या प्राणी-पक्षांचे चित्रस्वरुपात केलेल्या डॉक्युमेंटेशनचा देखील उल्लेख केला.
या शिवाय, श्रावण मास आणि त्याच्याशी जोडलेले आध्यात्म, कावड यात्रा, अमेरिकेतील विदेशी नागरिकांची अमरनाथ यात्रा, मुसलमान महिलांच्या मेहेरम शिवायच्या केलेल्या यात्रेचा अनुभव, नशामुक्ती अभियानांतर्गत 12 हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज नष्ट करून केलेला विक्रम, नशामुक्ती ते फुटबॉल फ्लेअर असा प्रवास असलेल्या मध्य प्रदेशातील गावाचा उल्लेख त्यांनी मन की बातमधून केला. तसेच घर-घर तिरंगा अभियान याही वर्षी उत्स्फूर्तपणे पुढे नेण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी मन की बातमधून केले.
हे ही वाचा :