मुंबई : पुढारी वृत्त वृत्तसेवा , कथित खिचडी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेले आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने २२ जानेवारीपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली आहे. ईडीने सूरज चव्हाण यांच्या ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायाधीश एस. एम. पाटील यांनी ५ दिवसांची कोठडी दिली आहे. (Maharashtra Politics)
कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकर यांची आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. अमोल कीर्तिकर यांच्या खात्यात ५२ लाख, तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात ३७ लाख रुपये जमा झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर ईडीकडून सूरज चव्हाण यांना १७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. गुरुवारी सकाळी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. पाटील यांच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. यावेळी ईडीच्या वतीने अॅड. सुनील गोंसाल्विस यांनी एका राजकीय नेत्याशी जवळीक असल्यानेच खिचडीच्या पुरवठ्यासाठी पालिकेकडून ऑर्डर मिळवण्यात चव्हाण यशस्वी झाले. पालिकेकडून ८.६४ कोटी रुपये खिचडी वाटपासाठी देण्यात आले. त्यातील ३.६४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला, त्यापैकी १.२५ कोटी हे सूरज चव्हाण यांच्या खात्यात आढळून आले. सूरज चव्हाण यांनी हे पैसे पगार व कर्जातून उभे केल्याचे म्हटले आहे. मात्र ते खोटे बोलत आहेत. अधिक चौकशीसाठी आठ दिवसांची कोठडी द्यावी, अशी विनंती केली.
याला चव्हाण यांच्या वतीने अॅड. हर्षद भडभडे यांनी जोरदार आक्षेप घेतला. देशभरात कोविडच्या काळात लॉकडाऊन करण्यात आले. त्यावेळी सर्वसामान्य जनता घरात अडकून पडली होती. गरिबांकडे खायला अन्न नव्हते. त्यामुळे पालिकेने गरजूंना खिचडी वाटप केले. माफक दरात काही कंत्राटदारांना खिचडी पुरवण्याचे काम देण्यात आले. या सर्व प्रक्रियेत सूरज चव्हाण यांचा कुठेही सहभाग नव्हता, चव्हाण केवळ मोठ्या राजकीय व्यक्तीच्या संपर्कात असल्याने त्यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला. उभय पक्षांच्या
युक्तिवादानंतर न्यायालयाने चव्हाण यांना ५ दिवसांच्या ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.