ठाणे; पुढारी वृत्तसेवा: मानहानी प्रकरणी ठोठावलेल्या शिक्षेविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली. या नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज ठाण्यात आंदोलन करण्यात आले. यावेळी पटोले यांनी मोदी सरकारचा न्याय व्यवस्थेवर दबाब असल्याचा गंभीर आरोप केला आहे. देशात सर्वांसाठी कायदा समान असल्याचे सांगत, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारला दिला आहे. तसेच निरव आणि ललित मोदी हे चोर नाहीत, हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान देखील यावेळी पटोले यांनी केले आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ३८ विभाग व सेलची एक दिवसीय कार्यशाळा ठाण्यात आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मार्गदर्शन केले. त्यापूर्वी पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधून मोदी सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांनी त्या वाक्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. परंतु न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून शिक्षा कायम ठेवली असेल तर न्यायव्यवस्थेवर खरंतर बोलता येत नाही. पण न्याय व्यवस्थेवर मोदी सरकारचा दबाव आहे हे याच्यातून सिद्ध झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.
मोदी सरकारच्या दबावांमध्ये येऊन न्याय व्यवस्था अशा कारवाया करत असेल तर, निश्चितपणे लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्ष देशभरामध्ये आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलले नव्हते. ते निरव आणि ललित मोदी यांच्याबद्दल बोलले होते. हे दोघे चोर नाहीत, हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही नाना पटोले यांनी केले आहे.
राज्यातील सरकार म्हणजे तीन तिघाडी काम बिघाडी सरकार असून, ते जनतेला लुटण्याचे काम करीत आहे. भ्रष्टाचार लोकांना सरकारमध्ये सामील करून घेत जनतेची फसवणूक करीत आहे. जे भाजपवाले महाविकास आघाडी सरकार बाबत बोलत आहेत, तेच आता अडकले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अपात्रतेबाबत 10 ऑगस्टपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यायचे आहे, अन्यथा सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल, असे पटोले यांनी सांगितले. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मंत्री पदावरून असंतोष निर्माण झाला आहे. तसेच शिंदे गटातील आमदारांची फ्री स्टाईल सगळ्यांनी पाहिले हेच यातून स्पष्ट होते.
मानहानीप्रकरणी ठोठावलेल्या शिक्षेविरोधात काँग्रेस नेते राहुल दाखल केलेली याचिका गुजरात उच्च न्यायालय फेटाळली. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह समोरील रस्त्यावर आंदोलन करत निषेध केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित हे आंदोलन करण्यात आले.