निपाणी; पुढारी वृत्तसेवा : जे कोणी राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणतात, त्यांचा भाजपने फौजदाराचा हवालदार केला आहे. त्यांनी राष्ट्रवादीची मापे काढू नयेत, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीस यांचे नाव न घेता केली. कर्नाटकच्या निवडणुकीसाठी निपाणी येथील प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील प्रचार सभेत 'मी पुन्हा येणार म्हटले की येतोच. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. मात्र, हा पक्ष महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यातच आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? येथेे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो, या शब्दांत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. त्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया तीव्र उमटल्या. याची दखल घेत जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, आमचा पक्ष साडेतीन जिल्ह्याचा नाही. शरद पवार यांच्या झंझावाताने 2024 मध्ये हा पक्ष महाराष्ट्रातील सर्वांत मोठा होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथे जे सत्ताधारी आहेत, त्यांनी या भागाला विकासापासून वंचित ठेवले. या भागात ना पाणी, ना चांगले रस्ते.
देशात हुकूमशाही वाढली आहे. सरकारच्या विरोधात बोललेले सत्ताधार्यांना पचत नाही. मला खात्री असून येथे बदल होणार, धर्मनिरपेक्ष सरकार कर्नाटकात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार ते पाच उमेदवार निवडून येणार आहेत. फडणवीस यांनी आपल्या पक्षावर टीका केली. पण भाजपने त्यांना फौजदाराचे हवालदार केले आहे. त्यांनी आमची मापे काढू नये. मुख्यमंत्रीपद मिळेल या आशेने कारस्थान करून त्यांनी चांगले काम करणारे मविआ सरकार पाडले. मात्र त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले, असे ते शेवटी म्हणाले.