मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक ट्विट केले असून त्यानुसार यंदाच्या मार्चमध्ये राज्यातून २,२०० मुली बेपत्ता झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रातून ५ हजार ६१० मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यासंदर्भात गृह खात्याने तातडीने विशेष तपास पथक कार्यरत करावे, अशी मागणी केली आहे.
मार्च महिन्यामध्ये सरासरी दररोज ७० मुली गायब झाल्याची आकडेवारी उघड झाली आहे. बेपत्ता झालेल्या मुलींचे वय १८ ते २५ दरम्यान आहे. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यामध्ये राज्यातील ५ हजार ६१० तरुणी गायब झाल्या आहेत. लग्न, नोकरी, प्रेमाचे आमिष ही यामागील कारणे असल्याचे सांगितले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात १८१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. दखल घेण्याजोगी बाब म्हणजे बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये अल्पवयीन मुलींचा समावेश नाही. प्रेमप्रकरण अथवा आमिषाला बळी पडून बेपत्ता झालेल्या मुली, महिला यांची संख्या वाढत असल्याने राज्यासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या १६ महिन्यांत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता व्यक्तींबाबत खास विभाग आहे. तो कार्यरत आहे की नाही? त्यांचे काम कसे चालते, हे पाहणे गृह खात्याचे काम आहे. यासंदर्भातील अहवाल आम्ही राज्य शासनाला पाठवल्याचे चाकणकर यांनी स्पष्ट केले.