पुढारी ऑनलाईन डेस्क : Madhya Pradesh Election : विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने जोरदार विजय मिळवला, तर तेलंगणात काँग्रेसने परिवर्तन करत सत्ता मिळवली मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येईल, अशी अपेक्षा होती मात्र तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या विजयाने विश्लेषकांना कमालीचे आश्चर्यचकित केले आहे. चला, या निकालामागे कोणते घटक होते ते जाणून घेऊया.
'लाडली बहना' योजनेअंतर्गत शिवराज सिंह चौहान सरकारने राज्यातील 1 कोटी 31 लाख महिलांना दरमहा 1250 रुपये दिले. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. ती वाढवून तीन हजार रुपये करण्याची घोषणाही करण्यात आली. या योजनेमुळे शिवराज सरकारच्या बाजूने महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले, असे मानता येईल. महिलांनी भाजपच्या बाजूने कौल दिला, या 4 टक्के वाढीव मतदानामुळे सातत्याने पिछाडीवर असलेला भाजप या योजनेमुळे शेवटच्या क्षणी आघाडीवर राहिला. या एकाच कारणामुळे मध्य प्रदेशातील निवडणुकीचे निकाल बदलले. याशिवाय तीर्थ दर्शन, लाडली लक्ष्मी, कन्यादान योजना, आयुष्मान योजना, आणि मुख्यतः थेट बँक हस्तांतरणाचा परिणाम या सर्वांच्या एकत्रित परिणामामुळे निर्माण झालेला अंडरकरंट समजून घेण्यात काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली. शिवराज सरकारच्या विरोधात जनतेमध्ये वाढलेली सत्ताविरोधी भावना आपल्याला सहज सत्तेत आणेल, असा त्यांना विश्वास होता. हा अतिआत्मविश्वास काँग्रेसला महागात पडला. (Madhya Pradesh Election)
हिंदू धार्मिक स्थळांना अध्यात्मासोबतच आधुनिकता देण्यावर भाजप सरकारचा भर होता. उज्जैन कॉरिडॉर हे त्याचे उदाहरण आहे. याशिवाय शिवराज यांनी सल्कानपूरमधील देवलोक, ओरछा येथील रामलोक, सागरमधील रविदास स्मारक आणि चित्रकूटमधील दिव्य वनवासी लोक या राज्यातील चार मंदिरांच्या विस्तारासाठी 358 कोटी रुपयांचे बजेट दिले. या सर्व योजनांमुळे हिंदुत्वाच्या बाजूने वातावरण निर्माण झाले, ज्याचा थेट फायदा भाजपला झाला. याशिवाय काँग्रेसच्या जात जनगणनेच्या विरोधात भाजपचा 'हिंदुत्वाचे कार्ड' खूप यशस्वी ठरले.
मध्य प्रदेश हा आरएसएसचा बालेकिल्ला आहे. राज्यही प्रदीर्घ काळापासून हिंदुत्वाची प्रयोगशाळा आहे. संपूर्ण राज्यात आरएसएस केडर लोकांवर प्रभाव टाकण्यात आणि त्यांच्या पक्षाच्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भाजप काँग्रेसच्या मागे पडेल, असे भाकीत वर्तविल्यानंतर हा केडर चांगलाच सक्रिय झाला. स्वयंसेवकांच्या कार्यकर्तृत्वामुळे खेड्यापाड्यातून आणि शहरातून भाजपचे पारंपरिक मतदार बाहेर पडले, जे भाजपला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले. साधारणपणे आरएसएसचे स्वयंसेवक हे राजकीय सक्रियता प्रत्यक्षपणे दाखवत नाहीत, पण अप्रत्यक्षपणे मतदारांवर प्रभाव टाकण्याचे काम करते. मात्र, मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे काम केले ते पाहून असे मानले जाऊ शकते की, संपूर्णपणे भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. (Madhya Pradesh Election)
राज्यात आदिवासींसाठी 47 जागा राखीव आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला केवळ 16 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 31 जागा जिंकता आल्या होत्या. याच आधारावर 2018 मध्ये काँग्रेसचे सरकारही स्थापन झाले. यातून धडा घेत शिवराज सरकारने या वर्गासाठी योजनांची मालिका सुरू केली. बिरसा मुंडा जयंती, भोपाळच्या हबीबगंज स्थानकाचे राणी कमलापती असे नामकरण, तंट्या भील्ल चौक, आदिवासी पंचायतींमध्ये पेसा कायद्याची अंमलबजावणी यासारख्या योजनांवर सातत्याने काम करण्यात आले. येथेही काँग्रेस त्यांच्या पारंपरिक पाठिंब्यावर अवलंबून राहिली. या वर्गात त्याची सक्रियता खूपच कमी होती.
मंत्री आणि खासदारांनी त्यांचा प्रभाव वापरून जवळपासच्या जागा जिंकण्यासाठी मदत करणे अपेक्षित होते. एक्झिट पोलच्या प्रदेशनिहाय निकालातही ते ज्या भागात उतरले होते, तेथील अनेक जागांचे निकाल भाजपच्या बाजूने लागल्याचे दिसून आले. म्हणजेच त्यांना उभे करण्याचा निर्णय योग्य ठरला आहे.
कमलनाथ यांच्या तुलनेत शिवराज संपूर्ण राज्यात लोकप्रिय नेते म्हणून दिसले. आमदारांच्या विरोधात स्थानिक पातळीवर सत्ताविरोधी लाट नक्कीच दिसली पण जसे बोलले जात होते तशी सत्ताविरोधी लाट शिवराज यांच्या विरोधात दिसली नाही. त्याचवेळी भाजपने राज्यातील सर्व पोस्टर्स आणि बॅनरमध्ये मोदींच्या चेहऱ्याला महत्त्व दिले. 'मध्य प्रदेशच्या मनात मोदी आणि मोदींच्या मनात मध्य प्रदेश' या घोषणेने संपूर्ण निवडणुकीत ठसा उमटवला. अनेक राजकीय विश्लेषक सतत सांगत होते की, मोदींची जादू हरवली आहे, पण मोदींचा चेहरा सर्व घटकांना मागे टाकत असल्याचे निकालावरून दिसून येत आहे. याचाच अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा मोदींच्या चेहऱ्यावर एकजूट पाहायला मिळणार आहे.
कमलनाथ आणि दिग्विजय सिंग यांच्या जोडीने काँग्रेसच्या विजयासाठी जुन्या चेहऱ्यांवर विसंबून शिवराज सरकारच्या विरोधात विजय मिळवण्याचा खेळ सुरू केला. याशिवाय पक्षाने केलेल्या सर्व्हेक्षणात काँग्रेसच्या प्रचंड विजयाची सतत चर्चा होत होती. त्यामुळे मतदारांशी जमिनीवर संपर्क साधण्याऐवजी काँग्रेस अतिआत्मविश्वासाचा बळी ठरली आणि ते वरवरचे सक्रिय असल्याचे दिसून आले. तर फीडबॅकच्या आधारे भाजप सातत्याने आपली कामगिरी सुधारत असल्याचे दिसून आले.
भाजपने शिवराज यांना मध्य प्रदेशात सीएम उमेदवार म्हणून उभे केलेले नाही. मात्र शिवराज यांनी प्रचारादरम्यान मतदार आणि महिलांना स्पष्ट विचारले की, तुमचा मामा, तुमचा भाऊ मुख्यमंत्री व्हावा असे तुम्हाला वाटत नाही का? शिवराज यांच्या या प्रश्नावर मतदारांनी प्रचंड जल्लोषात त्यांच्या बाजूने प्रतिसाद दिला. मतदारांनी केवळ प्रतिसादच दिला नाही, तर शिवराज यांना भरभरून मतदान केल्याचेही आता आकडेवारीवरून दिसून येते.
काँग्रेसने मुस्लिम व्होट बँक आपल्याकडे वळविण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. प्रत्युत्तरात भाजपने काउंटर ध्रुवीकरणावर काम केले. मुस्लीम मते जास्त असलेल्या जागांवर भाजपने जोरदार ध्रुवीकरण करण्यात यश मिळवले. कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून सातत्याने मुस्लिम ध्रुवीकरणाचा संदेश पुढे करण्यात आला. येथे मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणामुळे भाजपचा उमेदवार पराभूत होऊ शकतो, असे लोकांच्या मनात बिंबवले गेले. त्यामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण होण्यास मदत झाली. त्यामुळे अटीतटीच्या मतदार संघातील अनेक जागांचे निकाल बदलले.