पुणे : पुढारी वृत्तसेवा : सन 2014 आणि 2019 या सलग दोन कार्यकालानंतर 2024 मध्ये मोदी सरकारला सलग तिसरी संधी देण्यासाठी देशातील जनता उत्सुक असल्याचे 'पुढारी-सीएसडीएस-लोकनीती'च्या देशव्यापी मतदानपूर्व सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. 19 राज्यांतील 100 लोकसभा मतदारसंघांतील 10,000 हून अधिक मतदारांच्या सर्वेक्षणातून 'फिर एक बार मोदी सरकार' हा कल समोर आला आहे.
सलग दोन कार्यकालानंतर निर्माण होऊ शकणार्या सत्ताविरोधी जनमताचा (अँटी-इनकम्बन्सी) फटका मोदी सरकारला बसण्याची चिन्हे नाहीत. मोदी सरकारला आणखी एक संधी दिली पाहिजे का, या प्रश्नावर 44 टक्के मतदारांनी 'होय' असे सांगितले. सर्वेक्षणाचे संचालक आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक सुहास पळशीकर यांनी सांगितले की, यंदाच्या मतदानपूर्व सर्वेक्षणाचा कल काय, याचे स्पष्ट उत्तर हे आहे की, बहुसंख्य मतदार मोदी सरकारला 'आणखी एक संधी' देण्यास इच्छुक आहेत. तिसर्यांदा सत्ता मिळवू पाहणार्या सरकारच्या द़ृष्टीने ही उल्लेखनीय म्हणावी अशीच कामगिरी आहे.
2014 मध्ये 282 जागा जिंकत भाजप केंद्रात सत्तास्थानी आले, त्यावेळी भाजपला 31 टक्के मते मिळाली होती. 2019 मध्ये 303 जागा जिंकत 37.7 टक्के मतांसह भाजप दुसर्यांदा केंद्रात सत्तास्थानी आले.
2024 च्या मतदानपूर्व सर्वेक्षणानुसार भाजपला 40 टक्के मते मिळाल्यास '400 पार'चे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. मतदार सर्वेक्षणाविषयी प्रा. पळशीकर पुढे म्हणतात, मोदी सरकार पुन्हा का निवडून आले पाहिजे, असे विचारले असता, मतदारांकडे ठोस उत्तर नसले, तरी मोदी सरकारने केलेल्या चांगल्या कामाचे ते कौतुक करतात.
'सीएसडीएस-लोकनीती'ने गेल्या तीन मतदानपूर्व सर्वेक्षणांत नोंदविलेला कल अचूक ठरला आहे. केंद्र सरकारला पुन्हा संधी मिळाली पाहिजे का, या प्रश्नावर 2009 मध्ये 55 टक्के (यूपीए विजयी), 2014 मध्ये 23 टक्के (यूपीए पराभूत), तर 2019 मध्ये 47 टक्के (एनडीए विजयी) मतदारांनी 'होय' असे म्हटले होते.