पुणे; पुढारी वृत्तसेवा : राजकारण चुकीच्या लोकांच्या हाती जात आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रही उत्तरेतील राज्ये उत्तर प्रदेश, बिहारप्रमाणे जातीपातीत अडकला, धर्मांध व्हायला लागला आहे, अशी टीका करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, हे राज्य आपण कोठे घेऊन चाललो आहोत, अशी विचारणा केली. सहजीवन व्याख्यानमालेत नवं काहीतरी या विषयांवर व्याख्यान देताना ठाकरे मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे बोलत होते. व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी आणि पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले.
ठाकरे म्हणाले, राजकारण हे मुळात वाईट नाही. तुमच्या आयुष्याशी, भवितव्याशी निगडीत आहे. ते नासवले जात आहे, चुकीच्या हाती पडत आहे, त्यामुळे तुम्ही सर्वांनी त्याकडे शांतपणे बघत बसू नये. तुम्ही केवळ मतदानाला येता. पण, तुमचा दबाव गट नाही. लोकप्रतिनिधींना तुमची भीतीच वाटत नाही. तुम्ही राजकारणात आल्याशिवाय, अस्तित्व निर्माण केल्याशिवाय काहीही घडणार नाही. त्यामुळे, तुम्ही राजकारणात भाग घ्यायला हवा. विविध क्षेत्रात चांगली कामे करणार्या लोकांसोबत राजकारणात काम करण्यास मी तयार आहे.
मुंबई बरबाद होण्यास काही वेळ लागला. पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आपण मूळ प्रश्नाला हातच घालत नाही. पुण्यात मेट्रोवर आपण खर्च करतो, उड्डाणपूल बांधतो. हा खर्च का करतो, याची विचारणा कोण करणार. पुण्यात 40 लाख दुचाकी वाहने आहेत. आपला देश वाहनांचे डंपिंग ग्राऊंड बनले आहे. मग सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोण वापरणार आहे, आपण हे प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारले पाहिजेत.