नान्नज, पुढारी वृत्तसेवा: जामखेड तालुक्यातील नान्नज-घोडेगाव रस्त्याची गेली अनेक वर्षांपासून वाताहत झाली आहे. या रस्त्यावरील नान्नज गावाजवळील कौतुका नदीवरील पूल सध्या पाण्याखाली गेला आहे. घोडेगावजवळील कणेरी नदीवर पूलच नसल्याने या दोन्ही गावांतील शेतकर्यांसह नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरील दोन्ही पुलांच्या कामांना संबंधित विभागाने त्वरित मंजुरी देऊन, या रस्त्यांचे काम हाती घ्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. नान्नज-घोडेगाव हा आठ किलोमीटर अंतराचा रस्ता असून, या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील नान्नजजवळील कौतुका नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून पाण्यातून ये-जा करावी लागते. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून, नुकत्यात झालेल्या पावसामुळे नान्नज-घोडेगाव रस्त्यावरील कौतुका नदीवर असणारा पूल शेजारी असणार्या बंधार्यामुळे पाण्याखाली गेला. यामुळे नागरिकांना पाण्यातून घोडेगावचा मार्ग शोधावा लागतो.
या रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने शेतकर्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. वर्षभरापूर्वी कौतुका नदीवरील पुलासाठी ठेकेदाराने नदीपात्रात सिमेंट नळ्या व खडी आणून टाकली; मात्र नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या पुलाची मागणी केल्याने याचे काम रखडले. सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून, या रस्त्यावरून नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावरील चारचाकी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. घोडेगावजवळील कनेरी नदीवर गेल्या अनेक वर्षांपासून पूलच नसल्याने येथील शेतकर्यांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावरील घोडेगाव शिव ते गवळी वस्ती असे 800 मीटर अंतरामध्ये ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला सात-आठ महिन्यांपूर्वी खडी टाकून ठेवली; मात्र ती पसरविण्यास ठेकेदाराला अद्यापपर्यंत मुहूर्त मिळाला नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागतेय.
नान्नज- घोडेगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरील दोन्ही पुलांच्या कामांना अनेक वर्षांपासून मंजुरी मिळत नसल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. नान्नज-घोडेगाव रस्त्यावरील पुलांना मंजुरी कधी मिळणार, असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वेड्या बाभळीचे साम्राज असल्याने हा रस्ता दिसेनासा झाला आहे. रस्त्याला साईटपट्ट्या व साईट गटार नसल्याने पावसाळ्यात रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त होते. या रस्त्यावरील खडी व डांबर पूर्णत: गायब झाले आहेत. या रस्त्यावरील दोन्ही पुलांबाबत व रस्त्याच्या कामाबाबत नागरिकांनी पूर्वी लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला; मात्र या विषयाकडे सर्वांनीच कानाडोळा केला आहे.