Latest

कोल्हापूर : निवडीअगोदरच हवी सोयीची शाळा; कारणे अवाक् करणारी; भावी शिक्षकांकडून फिल्डिंग

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेमध्ये सुरू असलेल्या शिक्षक भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली. कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. निवडीचे पत्र अद्याप मिळाले नाही, तोपर्यंतच सोयीची, गावाजवळची शाळा मिळावी म्हणून आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सांगण्यात येत असलेली कारणे ऐकून अधिकारीही थक्क झाले आहेत. दरम्यान, कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली असून, 585 पैकी 16 जणांनी या पडताळणीकडे पाठ फिरविली.

जिल्हा परिषदेमधील शिक्षकांची सुमारे हजारच्या वर पदे रिक्त आहेत. शिक्षक भरतीचे अधिकार पूर्वी जिल्हा पातळीवर म्हणजे जिल्हा परिषदेला होते; परंतु युतीच्या काळात शिक्षक भरती आणि बदली प्रक्रियेत आमूलाग्र बदल करण्यात आला. शिक्षक भरती व बदलीचे अधिकार शासनाने आपल्याकडे घेत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन केली आहे.

जिल्हा परिषदेने रिक्त असलेल्या जागांच्या 70 टक्के जागा म्हणजे साधारपणे 750 ते 800 शिक्षक भरतीसाठी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पात्र उमेदवारांना ऑनलाईन माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार शिक्षकांनी माहिती भरली. या माहितीच्या आधारे कोल्हापूर जिल्हा परिषदेसाठी 585 शिक्षकांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये उर्दू शाळेतील 6 शिक्षकांचा समावेश आहे.

निवड यादीतील शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी दि. 4 मार्चपासून सुरू करण्यात आली. शनिवार, दि. 9 मार्च रोजी ही प्रक्रिया पूर्ण झाली. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर निवडीचे पत्र देण्यात येणार आहे. त्यापूर्वीच उमेदवारांनी सोयीची, जवळची शाळा मिळावी म्हणून अधिकार्‍यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

SCROLL FOR NEXT