पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Kolhapur Rain) सुरू असून सद्यस्थितीत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. इतर धरणांचा विसर्ग मिळून 7 ते 8 हजार क्युसेक पाणी येत्या 15 तासांत कोल्हापूर जवळ येईल. त्यामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढण्याचा अंदाज आहे. पंचगंगेच्या ४५ फूट पाणीपातळीच्या हिशोबाने प्रशासन पुरस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी आज (दि.२६) दिली.
नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन रेखावार यांनी केले आहे. दरम्यान जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील २८ शाळांना सुट्टी देण्याचे जाहीर केले. यामध्ये शिरोळ तालुक्यातील बहुतांश शाळांचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी ८.१५ वाजता राधानगरी धरणाचा सहा नंबरचा एक दरवाजा उघडला. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Kolhapur Rain) आज २६ जुलै रोजी सकाळी ८.१५ वाजता स्वयंचलित द्वार क्रमांक ६ उघडले आहे. धरणाचा एकूण १ दरवाजा उघडला आहे. या एक दरवाज्यातून १४२८ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. तर पावर हाऊसमधून १४०० क्यूसेक विसर्ग सुरु आहे. एकूण विसर्ग २,८२८ क्यूसेक सुरु आहे. धरणातील पाणी पातळी ३४७.३६ फूट इतकी आहे. (Kolhapur Rain)
नविन माहितीनूसार आज सकाळी (दि.२६) ९.१० वाजता राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडण्यात. त्यानंतर आणखी दोन दरवाजे उघडले आहेत.
संपूर्ण जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण पूर्ण संचय क्षमतेने भरले आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने थोडीशी उघडीप दिल्याने धरणाची पाणी पातळी स्थिर होती. आज पहाटे जोर वाढल्याने पहाटे 8.15 वा. धरणाचा सहा नंबरचा दरवाजा खुला झालं आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे जिल्ह्यातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
हेही वाचा