Latest

kolhapur News : ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना दरमहा मिळणार ५०० रूपये

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील (आयटीआय) शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 2023-24 मध्ये प्रवेशित प्रशिक्षणार्थींना दरमहा आता 500 रुपये विद्यावेतन मिळणार आहे. 40 वर्षांनंतर कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाने विद्यावेतनात वाढ केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागणार आहे.

आयटीआयमधील प्रशिक्षणार्थींना 1983 पासून विद्यावेतन दिले जात आहे. विद्यावेतनात गेल्या काही वर्षांपासून कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. यापूर्वी प्रशिक्षणार्थींना 40 ते 60 रुपयांपर्यंतचे विद्यावेतन मिळत होते. वाढती महागाई, शैक्षणिक साहित्याच्या किमती, वाहतूक खर्चात वाढ, प्रशिक्षणासाठी होणारा खर्च बहुतांश प्रशिक्षणार्थी सामाजिक, आर्थिकद़ृष्ट्या मागासवर्गातील विद्यावेतनातून करणे शक्य होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विद्यावेतनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

नुकतेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार या वर्षापासून 500 रुपये सुधारित विद्यावेतन प्रशिक्षणार्थींना देण्यास मान्यता देण्यात आली आहे. आयटीआयमध्ये शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सर्व प्रवर्गातील प्रशिक्षणार्थींना याचा लाभ होणार आहे. त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ दोन अपत्यांना मिळू शकणार आहे. हा लाभ दर तीन महिन्यांनी हप्त्याने दिला जाणार आहे. यासाठी प्रशिक्षणार्थींची 80 टक्के उपस्थिती आवश्यक असणार आहे. प्रशिक्षणार्थींच्या राष्ट्रीयीकृत बँकेतील खात्यावर महा-डीबीटी पोर्टलवरून विद्यावेतन देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT