पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. तांत्रिक तज्ज्ञ आणि सायबर तज्ज्ञांच्या मदतीने गुन्हे शाखा युनिट १० व्हिडिओची सत्यता तपासणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.१९) विधानसभेत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. (Kirit Somaiya Viral Video)
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह चित्रफीतप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.१८) विधान परिषदेत केली हाेती. हा विषय गंभीर असून, मी विरोधकांच्या भावनांशी सहमत आहे. विरोधकांकडे काही तक्रारी असल्यास त्यांचीही चौकशी केली जाईल, प्रकरण दडपले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले हाेते.
या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी चौकशीचे आश्वासन दिले. राजकारणात अनेकदा असे प्रसंग येतात, ज्यात माणसाचे संपूर्ण राजकीय आयुष्य पणाला लागते. केलेली पुण्याई पणाला लागते. आता जो काही प्रकार समोर आला आहे, त्यासंदर्भात विरोधकांकडे काही तक्रारी असतील, तर त्यांनी त्या आमच्याकडे द्याव्यात. आम्ही या सगळ्याची चौकशी करू. फक्त गृहितकांच्या आधारे चौकशी करता येणार नाही. संबंधित प्रकरणात महिलेची ओळख जाहीर करता येणार नाही. त्यामुळे पोलिस या महिलेची ओळख पटवतील आणि कायद्याच्या चौकटीत राहून या प्रकरणाचा तपास करतील, असेही फडणवीस म्हणाले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडीओने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. सोमवारी रात्री एका खासगी वाहिनीने हा व्हिडीओ प्रसारित केला. त्यानंतर मंगळवारी दिवसभर सोमय्या यांच्यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये सोमय्या हे आक्षेपार्ह अवस्थेत कोणाशी तरी संवाद साधत आहेत. विरोधकांनी ते कोणा महिलेशी अशा अवस्थेत संवाद साधत असल्याचा आरोप केला आहे. आता व्हिडीओ कॉलवरून संवाद साधत असलेली समोरची व्यक्ती कोण? हा मुद्दा चर्चेत आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. त्याचवेळी सोमय्या यांच्याविरोधात अद्याप कोणी तक्रारदार पुढे आलेला नाही.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी सभागृहात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह क्लिपचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, "ईडी, सीबीआयचा धाक दाखवून सोमय्या यांनी अनेकांना ब्लॅकमेल केले आहे. या माध्यमातून त्यांनी मराठी महिलांचे शोषण केले असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. महिलांना पद देतो, महामंडळ देतो, असे सांगून गैरफायदा घेतला. अशा व्यक्तीला केंद्र सरकारने सुरक्षा पुरविली आहे. याच सुरक्षेचा वापर महिलांचे शोषण करण्यासाठी होतो का? असा प्रश्न करतानाच त्यांची केंद्रीय सुरक्षा काढून घेण्याची मागणीही दानवे यांनी केली." त्याचबरोबर सोमय्या यांच्यासंदर्भातील आठ तासांच्या व्हिडीओ क्लिपचा पेनड्राईव्हच दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे देत कारवाईची मागणी केली.