पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनाली फोगाट हत्येप्रकरणी खाप पंचायत आता आक्रमक झाली आहे. जाट धर्मशाला येथे रविवारी झालेल्या सर्व खाप पंचायतीच्या महासभेत सोनाली फोगटच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला. याचा योग्य तपास केला गेला नाही तर खाप पंचायत जंतर मंतर मैदानावर आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला. यासोबतच सोनालीच्या मुलीसाठी आणि कुटुंबियांना सुरक्षा देण्याचीही मागणी केली. पंचायत पुढे म्हणते, सोनालीच्या मृत्यूच्या तपासाबाबत सरकार उदासीन आहे. सोनाली मुख्यमंत्री मनोहर लाल यांना वडिलांसमान मानत होती. पण आज तिच्या हत्येवर ते काहीच बोलताना दिसत नाहीत. आता याचा न्याय खाप पंचायत करेल.
यावेळी खाप पंचायतीमधील काही नेत्यांनी कुलदीप बिष्णोई यांच्यावरही आरोप केले. कुलदीप सोनालीच्या अंतिम संस्कारावेळीही प्रचार करत फिरत असल्याने अनेक खाप नेते नाराज असल्याचं दिसून आलं. जाट आरक्षण आंदोलनमध्ये झालेल्या हिंसेप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले खाप पंचायतीचे नेते दलजीत पंघाल यांनी तर सोनाली फोगट हत्येप्रकरणी भजनलाल आणि हरयाणातील भारतीय जनता पार्टीचे नेते कुलदीप बिष्णोईवर हत्येचा आरोप केला आहे. जर योग्य पावल उचलली गेली तर खाप पंचायतीला हा निर्णय घेण्याची आवश्यकताच पडली नसती असा सूर महापंचायतीमध्ये दिसून आला कुलदीप यांचं थेट नाव घेतल्याने महापंचायतीमधील काही नेत्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं तर काहींनी मात्र याचं खंडन करत विलंबाला सरकारला जबाबदार धरलं आहे.