Latest

सत्तेसाठी भगवी वस्त्र परिधान केली जात आहेत; कन्हैयाकुमार यांची विरोधकांवर टीका

backup backup

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : करो तैयारी राजतिलक की, आ रहे है भगवाधारी, अशा घोषणा सध्या दिल्या जात आहेत. त्यामुळे सत्तेसाठी भगवी वस्त्र परिधान केली जात आहे, अशी टीका कन्हैयाकुमार यांनी विरोधकांवर केली. भगवान गौतम बुद्धांच्या चिवराचा रंग भगवा, भारताच्या तिरंग्यात आणि काँग्रेसच्या झेंड्यातही भगवा रंग आहे. आम्हाला भगव्या रंगाची अडचण नाही. भगवान गौतम बुद्धांनी समाजासाठी राजपाट सोडला आणि भगवी वस्त्र धारण केली. सध्या तर राजपाट मिळवण्यासाठी भगवी वस्त्र परिधान केली जात आहेत. अचानकच या लोकांच्या मनात भगव्या रंगाविषयी प्रेम निर्माण झालं त्यामागे सत्ताकारण असल्याचं कन्हैयाकुमार म्हणाले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य कन्हैया कुमार हे अमरावती शहरालगत असणार्‍या नया अकोला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज 6 डिसेंबरला आले होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुंबईला गेलेले नया अकोला येथील रहिवासी पिरकाजी खोब्रागडे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या काही अस्थींना नया अकोला या गावात आणले होते. या अस्थी गावात एका कलशामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. अमरावतीत बाबासाहेब आंबेडकरांच्या नया अकोला येथील अस्थिकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन सोहळा काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आयोजित या अभिवादन सोहळ्याला कन्हैया कुमार यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, विचारवंत कैलास कमोद आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच विजय असो अशी मराठीत घोषणा देतं कन्हैयाकुमार यांनी भाषणाची सुरूवात केली. केवळ 14 एप्रिल आणि 6 डिसेंबरलाच डॉ. आंबेडकर यांचं स्मरण करून चालणार नाही. त्यांच्या वैचारिक मार्गावर चाललो तर अनेक समस्यांचं समाधान होईल. आधी दलित आपली जात लपवत होते. आता खासदार होण्यासाठी दलित असल्याचं सांगतात, त्यासाठी अनुसूचित जातीचं खोटं प्रमाणपत्र सादर करतात, अशी टीकाही कन्हैयाकुमार यांनी यावेळी केली. महाराष्ट्रात जर महापुरूष जन्मले नसते तर ही पुरोगामी भूमी झाली नसती. सामान्य माणसाला त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी इथं असामान्य माणूस जन्मतो. त्यामुळं त्या असामान्य महापुरूषांनी आपल्याला दिलेले अधिकार सुरक्षित राहण्यासाठी केवळ या दोन दिवशीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करून चालणार नाही, तर वर्षभर चोवीस तास त्यांच्या वैचारिक मार्गावरच आपल्याला चालण्याची गरज असल्याचं कन्हैयाकुमार म्हणाले.

450 रुपयात सरकारला गॅस सिलिंडर मागा

छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यानंतर तेथील नागरिकांना 450 रुपयात गॅस सिलिंडर मिळेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केली होती. महाराष्ट्रात देखील भाजपाच्या पाठिंब्याने शिंदे सरकार आहे. त्यामुळे येथील जनतेनंही आता मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे 450 रुपयात गॅस सिलिंडर द्यावा,ं अशी मागणी करण्याचं आवाहन काँग्रेस कमिटीचे सदस्य कन्हैया कुमार यांनी केले.

SCROLL FOR NEXT