स्वालिया शिकलगार; पुढारी ऑनलाईन डेस्क :
बॉलिवूडची 'क्वीन' कंगना राणावत (Kangana) नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. राष्ट्रीय पुरस्कार विजेती कंगना राणावत आपल्या प्रत्येक चित्रपटावरून नेहमीचं चर्चेत असते. चित्रपटांवरून मीडियामध्ये न केवळ ती चर्चेत राहते. तर आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांमध्ये एक वेगळी छापदेखील सोडलीय. काल कंगनासाठी (Kangana) सुवर्ण दिवस होता. उपराष्ट्रपती व्यंकैय्या नायडू यांनी ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिचा गौरव केला. पण, तिचा हा पहिला पुरस्कार नाहीये. याआधीही तिने तीन राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. आतापर्यंत चार राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी कंगना पहिली अभिनेत्री ठरली आहे. पण, तुम्हाला माहितीये का? बालपणापासूनचं बंडखोर असलेली कंगना वयाच्या १५ व्या वर्षी घरातून पळून गेली होती. आधीही तिने कुणाला जुमानले नाही आणि आताही ती सर्वांना पुरून उरते.
कंगनाला तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार २००८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट फॅशनसाठी मिळाला होता. त्यानंतर २०१४ मध्ये 'क्वीन'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. २०१५ मध्ये 'तनु वेड्स मनु'साठीदेखील कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. आता २०२१ मध्ये ६७ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिला 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' आणि 'पंगा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
कंगना राणावत आतार्पंत अनेक वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत आली आहे. बिनधास्त आणि स्पष्ट विधाने केल्यामुळे तिला अनेक आव्हानांनाही सामोरे जावे लागले आहे. तिच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्विट करणं, द्वेष पसरवणे आणि देशद्रोहाचे खटले होते. आक्षेपार्ह ट्विट केल्यानंतर ट्विटरने तिचे अकाऊंट तात्पुरते क्लोज केले होते. त्यावेळीही तिने व्यक्त होण्यासाठी असंख्य व्यासपीठ असल्य़ाचे म्हणत ट्विटरला सुनावले होते.
कंगनाने प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतही पंगा घेतलाय. तिने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, जावेद अख्तर यांनी कंगनाला घरी बोलावून धमकावलं होतं आणि ऋतिक रोशनला माफी मागण्यासाठी म्हटलं होतं. कंगनाच्या मुलाखतीतील या विधानानंतर जावेद अख्तर भडकले होते. नंतर जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावरून कंगनाविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.
महेश भट्ट यांच्यावरही तिने आरोप केल होते. कंगनाची बहिण रंगोलीने म्हटले होते की-महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती. कारण कंगनाने त्यांच्या चित्रपटात सुसाईड बॉम्बरची भूमिका करण्यास नकार दिला होता.
कंगना राणावत व तिच्या बहिणी विरोधात धार्मिक भावना भडकवणे आणि दोन समूहांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. असंख्य प्रकरणांमधील वादात कंगना अडकली होती. तिच्यावर विविध प्रकरणांतर्गत अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
कंगना आणि ऋतिक रोशनच्या अफेअरच्या खूप चर्चा रंगल्या होत्या. कंगनाने ऋतिक रोशनला पाठवण्यात आलेल्या ईमेल प्रकरणाची चांगलीचं हवा झाली होती. कंगना विरोधात ऋतिक रोशनने एफआयआर केलं होतं. ऋतिकने २०१७ मध्ये सायबर सेलमध्ये एक तक्रार दाखल केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, २०१३ ते २०१४ पर्यंत १०० ई-मेल मिळाले होते. तक्रारीत म्हटलं होतं की, हे ई-मेल कंगनाच्या मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. या मुद्द्यावरून ऋतिक रोशनने २०१७ मध्ये सायबर सेलमध्ये एक तक्रार दाखल केली होती. यावर कंगना म्हणाली होती, तिचे ई-मेल हॅक झालं होतं आणि तिने ऋतिकला कोणताही ई-मेल केलेला नव्हता.
बेकायदा बांधकामासंदर्भात महापालिकेने कंगनाला नोटीस बजावली होती. पण, उत्तर न आल्याने कंगनाच्या मुंबईतील अवैध कार्यालयालयावर बीएमसीने जेसीबी चालवला होता. या कारवाईविरोधात कंगना न्यायालयात गेली होती.
कंगनाने सोशल मीडियावरून सांगितले होते. ती वयाच्या १५ व्या वर्षी कशी बंडखोर झाली, हे तिने सांगितले होते. ती म्हणाली होती – एकदा तिला वडिलांनी कानाखाली लगावली होती. त्यावेळी कंगनादेखील बंडखोर झाली होती.
कंगनाने म्हटले होते की, "माझ्या वडिलांकडे रायफल आणि पिस्तुल होती. मी लहान होते. ते माझ्यावर रागावले की, माझे पाय थरथर कापत. त्यांच्या काळात ते कॉलेजमध्ये गँगवार करण्यासाठी प्रसिद्ध होते. यामुळे त्यांची ओळख गुंड अशी झाली होती. मी वयाच्या १५ व्या वर्षीच त्यांच्यासोबत भांडून घर सोडले होते. मी वयाच्या १५ वर्षांच्या वयातच पहिली बंडखोर राजपूत महिला ठरले होते."
आपल्या वडिलांसंदर्भात बोलताना कंगनाने त्यांचा फोटो शेअर केला आहे. तिने म्हटले आहे, 'मी जगातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर व्हावे, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. जेव्हा मी शाळेत जाण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, तुम्ही मला कानाखाली माराल, तर मीही तुम्हाला मारीन.'
कंगना म्हणाली की, 'तेथे आमच्या नात्याचा शेवट झाला होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी केवळ माझ्याकडे आणि माझ्या आईकडे बघितलं आणि आपल्या खोलीत निघून गेले. मला माहित होतं की, मी मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यानंतर मी त्यांना पुन्हा मिळवू शकले नाही. मी कायमची त्यांच्यापासून दूर गेले. मी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी काहीही करू शकत होते.'
ती म्हणते की- या चिल्लर इंडस्ट्रीला वाटते, की, मला मिळालेले यश माझ्या डोक्यात घुसले आहे. ते मला नीट करू शकतात. पण, मी नेहमीच बंडखोर होते. यशामुळे फक्त माझा आवाज वाढला आहे. इतिहास साक्षी आहे, की ज्यांनी-ज्यांनी मला नीट करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मीच नीट केले आहे. बॉलिवूडमध्ये नेपोटिझ्म जोरात आहे. ज्या कलाकारांची कुठलीही कलेशी पार्श्वभूमी नाहीये. त्यांना या इंडस्ट्रीत टिकू दिलं जात नाही.
पण, कंगनाने तिची कुठलीही फिल्मी पार्श्वभूमी नसतानाही तिने इंडस्ट्रीत बस्तान बसवले. वयाच्या १६ व्या वर्षी एकटी मायानगरी मुंबईत येऊन आपली ओळख बनवणं सहजसोप्पं नाही. मार्गात अनेक काटे रुतले असतील. पण, त्या काट्यांच्या जखमा भरून येण्यासाठी तिने दिवस-रात्र मेहनत घेतली. ती आपल्या मतांवर ठाम राहीली. इंडस्ट्रीतील अनेक बाबी समोर आणल्या. म्हणूनचं की काय-तिला काही वर्गाकडून विरोध होत राहिलाय.