पुढारी ऑनलाईन डेस्क : पत्रकार सौम्या विश्वनाथन (Saumya Vishwanathan) यांच्या हत्या प्रकरणी आज (दि. २५) चारही आरोपींना दिल्लीच्या साकेत न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रवी कपूर, अमित शुक्ला, बलबीर मलिक आणि अजय कुमार अशी या आरोपींची नाव आहेत. न्यायालयाने या चार आरोपींना दंडही ठोठावला आहे.
एका प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकार विश्वनाथन यांची 30 सप्टेंबर 2008 रोजी रात्रीच्या सुमारास दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला रोडवर, कार्यालयातून घरी परतत असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लुटमार करण्याच्या उद्देशातून ही हत्या झाली असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. (Saumya Vishwanathan)
यापूर्वी या हत्या प्रकरणात 18 ऑक्टोबर रोजी न्यायमूर्तींनी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार यांना भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 302 (हत्या) आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या (MCOCA) तरतुदींनुसार दोषी ठरवले होते. तसेच या प्रकरणातील पाचवा आरोपी अजय सेठी याला देखील दोषी ठरवून आयपीसी कलम 411 (अप्रामाणिकपणे मालमत्ता मिळवणे) आणि MCOCA तरतुदींनुसार, संघटित गुन्हेगारीला जाणूनबुजून मदत करणे आणि प्रोत्साहन देणे आणि संघटित गुन्हेगारीचा पैसे मिळवण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते.
30 सप्टेंबर 2008 रोजी कार्यालयातून घरी परतत असताना सौम्या यांची कारमधून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दिल्लीतील वसंत कुंज पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी चौकशीच्या आधारे पोलिसांनी सौम्याच्या हत्येच्या आरोपाखाली रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी यांना अटक केली होती. यासोबतच पोलिसांनी आरोपींविरुद्ध 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' (मोक्का) देखील लागू केला होता.
हेही वाचा