पुढारी ऑनलाईन डेस्क : सरकार फक्त पंचनाम्याची घोषणा केलेली आहे मात्र याची अंमलबजावणी होईल असं मला वाटत नाही अशी शक्यता जयंत पाटील यांनी आज वर्तविली. माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी अवकाळी पावसानंतर शेतकऱ्याच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली.सरकारने यासाठी ठोस पावले उचलावीत असे मतही व्यक्त केले.
राष्ट्रवादीच्या एक्स या सोशल मीडियावर आज झालेल्या पत्रकार परिषदेबाबत माहिती दिली आहे. यामध्ये लिहीले आहे की, राज्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीक विम्याच्या बाबतीत सरकारने अनेक घोषणा केल्या. पण मदत मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. विदर्भात तुरीच्या पिकांचे, नंदुरबारमध्ये मिरचीचे तर जळगाव व नाशिकमध्ये द्राक्ष व कांद्याचे नुकसान झाले आहे. तसेच, या अवकाळी पावसामुळे जनावरांचे देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी त्याची अंमलबजावणी होईल असे वाटत नाही.
पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, सर्व परिस्थिती पाहता त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या व त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शेतकरी आक्रोश मोर्चा व ट्रॅक्टर रॅली काढण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. ३०) जळगाव, शुक्रवारी (दि १ डिसेंबर) नाशिकच्या दिंडोरी येथे तर ०५ डिसेंबर रोजी अमरावती येथे हा मोर्चा निघेल व राज्य स्तरावरील पक्षाचे महत्वाचे नेते त्यात सहभागी होतील. कोणताही विषय आला तर सध्याचे सरकार महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवते. मविआ म्हणून आम्ही सर्व मित्र पक्ष एक दिलाने काम करत आहोत. राज्यावर कोरोनाचे सावट असतानाही मविआ शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आज सरकारकडून फक्त घोषणाच केल्या जात आहेत. असे आरोप जयंत पाटील यांनी केले.