नवी दिल्ली : डेंग्यू किंवा अन्य काही आजारांमध्ये रक्तातील प्लेटलेटस्चे प्रमाण कमी होत असते. रक्तातील प्लेटलेटस्ची कमतरता 'थ्रोम्बोसायटोेपेनिया' म्हणून ओळखली जाते. प्लेटलेटस्ची संख्या कमी झाल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्लेटलेटस्चे प्रमाण योग्य राखण्यासाठी विशिष्ट आहार उपयुक्त ठरत असतो.
रक्तातील प्लेटलेटस्च्या कमतरतेमुळे शरीर कमकुवत होते आणि लवकर थकवा येतो. किरकोळ जखम झाली तरी जास्त रक्तस्राव होतो. तसेच हिरड्यांमधून रक्त येणे हे देखील त्याच्या लक्षणांपैकी एक आहे. प्लेटलेटस्च्या कमतरतेमुळे काही रुग्णांचा मृत्यूही होतो. निरोगी व्यक्तीमध्ये प्लेटलेटस्ची सामान्य संख्या 150 हजार ते 450 हजार प्रति मायक्रोलिटर इतकी असते. ज्यावेळी ही संख्या 150 हजार प्रतिमायक्रोलिटरच्या खाली येते त्यावेळी ती कमी प्लेटलेटस्ची स्थिती मानली जाते.
डेंग्यू, जीवाणू संसर्ग, इडिओपॅथिक थ्रोम्बोसायटोपेनिक पर्पुरा, हेमोलायटिक युरेमिक सिंड्रोम, हायपरस्प्लेनिझम आदी अनेक कारणांमुळे प्लेटलेटस् कमी होऊ शकतात. रक्तातील प्लेटलेटस् वाढवण्यासाठी आहारात काही फळे व भाज्यांचा समावेश करणे लाभदायक ठरते असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्यामध्ये पपई, बीट, खजूर, डाळिंब यांचा समावेश आहे. पपईच्या सेवनाचे परिणाम लवकर दिसून येत असतात.
बीटरूटच्या सेवनाने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. तसेच प्लेटलेटस्ची संख्याही झपाट्याने वाढू लागते. बीटमध्ये लोह, अँटिऑक्सिडंटस् आणि हेमोस्टॅटिक असते व त्याचा लाभ मिळतो. खजुरात लोह व अन्यही अनेक पोषक घटक असतात. डाळिंबात फायबर, व्हिटॅमिन के, सी आणि बी, लोह, पोटॅशियम, ओमेगा-6 फॅटी अॅसिड व अन्य पोषक घटक असतात. त्यामुळे प्लेटलेटस् वाढण्यास मदत मिळते.