Latest

Bengaluru water crisis | बंगळुरात तीव्र जलसंकट! १५ लाख IT कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळूरमधील रहिवाशांना सध्या तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यामुळे काही नेटिझन्सनी आयटी उद्योग आणि सरकारकडे कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुविधा देण्याची विनंती केली आहे. जर कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरुपात घरातून काम करण्याचा पर्याय दिला तर भारताची सिलिकॉन व्हॅली असलेल्या बंगळूरला जलसंकटावर मात करण्यास मदत होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त द इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. (Bengaluru water crisis)

अनेक कायदेशीर आणि जल तज्ज्ञदेखील कर्नाटक सरकारला पाणी संकटावर उपाय म्हणून वर्क फ्रॉम होम पर्याय सूचवत आहेत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना, कर्नाटक आणि आसामच्या उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती के. श्रीधर राव यांनी, विशेषत: बंगळूरमधील सुमारे १५ लाख आयटी कर्मचाऱ्यांसाठी अल्पकाळासाठी घरातून काम करण्याचे धोरण लागू करण्याचा उपाय सुचवला आहे. एका वर्षासाठी वर्क फ्रॉम होम व्यवस्था करण्यास परवानगी दिल्यास सुमारे १० लाख लोक त्यांच्या गावी परततील, ज्यामुळे बंगळूरच्या संसाधनांवर आलेला ताण काही प्रमाणात कमी होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

लोकसंख्येत वाढ

१९८० च्या दशकात बंगळूर शहराची लोकसंख्या २५ ते ३० लाखांच्या दरम्यान होती. आता ती १.५ कोटींवर गेली आहे, असे न्यायमूर्ती राव यांनी निदर्शनास आणून दिले आहे. कर्नाटकला २००३-२००४ च्या तीन वर्षांच्या दुष्काळाचा सामना करावा लागत होता. पण त्यावेळी लोकसंख्या कमी होती. यामुळे त्याचा तिसकासा प्रभाव जाणवला नाही असे सांगत त्यांनी तलावांतील गाळ उपसण्यासारखे पर्यायही त्यांनी सुचवले आहेत.

वर्क फ्रॉम होम पर्याय

न्यायमूर्ती राव यांच्या सूचनांशी अनेक नेटिझन्सनी सहमती व्यक्त केली आहेत. "वर्क फ्रॉम होममुळे (WFH) जलसंधारणासाठी सक्रियपणे योगदान मिळेल. लोक त्यांच्या मूळ गावी परततील, जेणेकरुन बंगळूरवरील ताण कमी होण्यास मदत होईल" असे एका यूजर्सने म्हटले आहे.

दुसऱ्या एका यूजर्सने म्हटले, "आयटी कंपन्यांनी स्थलांतरित कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी आणि उन्हाळा संपेपर्यंत रिमोट जॉब करण्यासाठी वर्क फ्रॉम होम द्यावा लागेल. यामुळे बंगळूरच्या लोकांना पाणी संकटातून दिलासा मिळेल."

काही नेटिझन्सनी सांगितले की कोरोना महामारीदरम्यान कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पर्याय दिला होता. आता या पर्यायावर गंभीरपणे विचार केला पाहिजे. "कोविड-१९ दरम्यान कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांनी वर्क फ्रॉम होम (WFH) ला कंपन्यांना समर्थन दिले होते. आता ही वेळ आली आहे की त्यांनी होम फ्रॉम ऑफिससाठी परवानगी द्यावी," असे एका यूजर्सनी सांगितले.

कमी पावसाचा परिणाम

कमी पावसामुळे बंगळूरमधील अनेक बोअरवेल कोरडी पडली आहे. यामुळे पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. भारतीय भूगर्भशास्त्र सर्वेक्षणाचे सेवानिवृत्त उपमहासंचालक एचएसएम प्रकाश यांनी, २०२४ च्या मान्सून हंगामातही कमी प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. २०२४ मध्ये मान्सून पर्जन्यमान कमी होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, २०२३ मध्ये कमी झालेला पाऊस आणि २०२४ मधील अपेक्षित तूट यांचा एकत्रित परिणाम दिसून येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. (Bengaluru water crisis)

दुसऱ्या सोशल मीडियाने आयटी कंपन्यांना सर्वांसाठी Work From Home घोषित करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, "निम्मे कर्मचारी त्यांच्या मूळ ठिकाणी परत जातील. यामुळे टंचाई कमी होईल," असे म्हटले आहे.

बोअरवेल्स पडली कोरडी

कर्नाटक सरकारच्या म्हणण्यानुसार, बंगळूरमधील १४ हजार बोअरवेल्सपैकी जवळपास निम्मे बोअरवेल्स कोरडी पडली आहेत. बंगळूर शहराला कावेरी नदीतून सुमारे १,४७० एमएलडी पाणी मिळते. कावेरी प्रकल्पाचा टप्पा ५ जूनपर्यंत पूर्ण झाल्यास बंगळूरमधील पाणी समस्येची तीव्रता कमी होईल, अशा आशा कर्नाटक सरकारला आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT