Latest

IPL 2024 : मुंबई इंडियन्‍स कॅप्‍टन बदलावर सुनील गावस्‍करांचे मोठे विधान, “रोहित शर्मा…”

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आयपीएल 2024 चा ( IPL 2024 ) हंगामात मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माला हटवून हार्दिक पंड्याला कर्णधार बनवले आहे. या निर्णयावर चर्चेला उधाण आले आहे. आता भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्‍कर यांनी या निर्णयावर मोठे विधान केले आहे.

IPL 2024 : रोहित शर्मा थोडा थकलेला दिसत होता

सुनील गावस्‍कर यांनी हार्दिक पंड्याला नवीन हंगामासाठी कर्णधार म्हणून नियुक्त करण्याच्या मुंबई इंडियन्स संघ व्‍यवस्‍थापनाच्‍या निर्णयाचे समर्थन केले. 'स्टार स्पोर्ट्स'शी बोलताना ते म्हणाले की, "रोहित शर्मा याने पाचवेळा मुंबईच्‍या संघाचे नेतृत्व केले आहे. ताे गेल्या काही हंगामात 'थोडा थकलेला' दिसत होता. 2022 च्या सुरुवातीपासूनच तो टीम इंडियाचे क्रिकेटमधील तिन्ही फॉरमॅटमध्ये नेतृत्व करत होता. गेल्या दोन वर्षांत रोहितचे फलंदाजीतील योगदान कमी झाले आहे. याआधी त्याने मोठी धावसंख्या केल्‍या आहेत. मागील दोन वर्षात मुंबई इंडियन्‍स हा संघ ९ आणि दहाव्‍या क्रमांकावर राहिला. तर मागील वर्षी हा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला हाेता."

कर्णधार बदलामुळे फ्रँचायझीला फायदा होईल

मागील काही वर्षांत आम्‍ही रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी पाहण्‍यास मुकलो आहोत. सतत क्रिकेट खेळल्यामुळे तो थोडा थकला होता. टीम इंडियाचे कर्णधारपद त्‍याचबरोबर आयपीएलमधील फ्रेंचायझीचे नेतृत्व यामुळे तो थोडा थकला होता. मला वाटते की, रोहित शर्मा याने हे लक्षात घेतले आहे की, हार्दिक हा एक तरुण कर्णधार आहे. हार्दिकच्‍या नेतृत्त्‍वाखाली गुजरातने दोनवेळा आयपीएलच्‍या अंतिम सामन्‍यात धडक मारली आहे. तसेच 2022 मध्ये संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे. मला वाटते की, या सर्व बाबींचा विचार करुन मुंबई इंडियन्‍स संघाच्‍या व्‍यवस्‍थापनाने हार्दिककडे कर्णधारपद सोपवले आहे. कर्णधार बदलामुळे फ्रँचायझीला फायदा होईल.

मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये शेवटचे IPL विजेतेपद जिंकले होते. पाचवेळा वेळा आयपीएल चॅम्पियन असणार्‍या या संघाने 2021 आणि 2022 मध्ये प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नव्‍हता. 2022 मध्ये तर हा संघ फ्रँचायझी पॉइंट टेबलच्या तळाशी राहिला होता.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT