Latest

IPL 2022 : यंदाच्या आयपीएलची लज्जतच न्यारी; रूपरेषेत अनेक लक्षवेधी बदल

Arun Patil

मुंबई ; वृत्तसंस्था : यंदाच्या (IPL 2022) आयपीएलचे वेगळेपण काय, असा प्रश्‍न कोणालाही पडू शकतो. सांगायचा मुद्दा असा की, यंदा आयपीएलमध्ये दोन नव्या संघांची भर पडली असून त्यामुळे एकूण संघांची संख्या आठऐवजी दहा झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यातील चार मैदानावर 70 सामने होणार आहेत. तब्बल दोन महिने आयपीएलचा कुंभमेळावा रंगणार आहे. मागील 14 वर्षे आयपीएलने भारतासह जगभरातल्या क्रिकेटप्रेमींना मनोरंजनाचा बंपर डोस दिला; पण यंदाच्या नव्या मोसमात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेच्या रूपरेषेत अनेक बदल केले आहेत.

त्यानुसार दहा संघांची दोन व्हर्च्युअल गटात विभागणी करण्यात आली आहे. मुंबई, कोलकाता, राजस्थान, दिल्ली आणि लखनौ एका गटात आणि चेन्‍नई, हैदराबाद, बेंगलोर, पंजाब आणि गुजरातचा दुसर्‍या गटात समावेश आहे. यातील प्रत्येक संघ आपल्या गटातील चारही संघांशी आणि समोरच्या गटातील एका संघाशी प्रत्येकी दोन सामने खेळेल. दुसर्‍या गटातील इतर चार संघांशी एकेक सामना खेळेल. त्यामुळे दहा संघ असेल. प्रत्येक संघ आधीप्रमाणे 14 साखळी सामने खेळेल.

आयपीएलच्या (IPL 2022) नव्या मोसमाआधी मेगा लिलाव पार पडला होता. जवळपास सगळ्या फ्रँचाईझींनी आपल्या संघात मोठे बदल केलेले पाहायला मिळणार आहेत. गेली अनेक वर्षे मुंबई इंडियन्सचा भाग असलेला हार्दिक पंड्या यंदा नव्याने दाखल झालेल्या गुजरात संघाचा कर्णधार आहे. लोकेश राहुलने नवख्या लखनौ संघाची कमान सांभाळलीय.

महत्त्वाची बाब अशी की, दिल्लीतून कोलकात्याच्या ताफ्यात सामील झालेला मुंबईचा श्रेयस अय्यर तिथला कर्णधारही बनलाय. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यंदा खेळाडू म्हणून खेळणार आहेत. धोनीने चेन्‍नईचे कर्णधारपद सोडले असून कोहली आरसीबीच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. प्रत्येक सामन्यागणिक वाढणारी उत्सुकता, उत्कंठावर्धक सामने आणि स्पर्धेचा जोश सुरुवातीपासून शेवटपर्यंत तसाच राहणार आहे. आयपीएलची हीच खासियत आहे.

SCROLL FOR NEXT