पुढारी ऑनलाईन डेस्क : Dhoni-Gambhir : लखनौ सुपर जायंट्सने हाय स्कोअरिंग सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहचली. यातच केएल राहुलच्या लखनौ संघाने चेन्नईचा ६ गडी राखून पराभव केला. सामना संपल्यानंतर लखनऊ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि चेन्नईचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे दोघे मैदानात चर्चा करताना दिसले. दोघेही बराच वेळ बोलताना दिसले. या भेटीनंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली. अनेकांनी मिम्सही करून ते शेअर केले. यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या.
लखनौला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्या सामन्यात लखनौने खूप चांगला खेळ केला होता. पण तेवतियाच्या आक्रमक खेळीच्या जोरावर गुरजातने त्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला. चेन्नई विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एलएसजीचे फलंदाज एविन लुईस आणि आयुष बडोनी यांनी तुफानी खेळी केली. या जोडीने १९ व्या षटकात शिवम दुबेच्या गोलंदाजीवर आक्रमण करत २५ धावा कुटल्या आणि सहा गडी राखून त्यांनी स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. (Dhoni-Gambhir)
सामना संपल्यानंतर चेन्नई संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि लखनौ संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर भेटले. दोघांमध्ये दिर्घ चर्चा रंगली होती. त्यांच्या मैदानावरील भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. यावर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. (Dhoni-Gambhir)
खुद्द गौतम गंभीरनेही त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबतच्या भेटीचे दोन फोटो शेअर केले आहेत. दोन्ही छायाचित्रे वेगवेगळ्या दिशांनी काढण्यात आली आहेत. गंभीरने कॅप्शनमध्ये लिहिले – 'कर्णधाराला भेटून आनंद झाला.'
आयपीएलच्या चालू हंगामात धोनीने चेन्नई संघाचे कर्णधारपद सोडले आहे. तो फक्त एक खेळाडू म्हणून खेळत आहे. सीएसकेने रवींद्र जडेजाला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. मात्र, धोनी विकेटच्या मागून कर्णधारपदाची धुरा सांभाळत असल्याचे या सामन्यातून दिसून आले आहे. (Dhoni-Gambhir)
धोनी आणि गंभीरच्या फोटोवर एक यूजर म्हणाला – आता तिरस्कार करणारे म्हणतील की हे छायाचित्र फोटोशॉपमध्ये तयार केले आहे. त्याच वेळी, दुसरा एक नेटकरी म्हणतो की, या जोडीने आम्हाला २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिला आहे. आणखी एका युजरने लिहिलंय की, २०११ च्या वर्ल्ड कप फायनलचा खरा हिरो. तर एका नेटक-याने मजेशीर प्रश्न विचारत, दोघांमध्ये रशिया-युक्रेन युद्धाची चर्चा सुरू होती की काय?, असे म्हटले आहे. (Dhoni-Gambhir)
गौतम गंभीर धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाकडून खेळला. २००७ टी-२० विश्वचषक आणि २०११ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन बनली. २०११ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी विजयी खेळी साकारली होती. विजेतेपदाच्या सामन्यात गंभीरने टीम इंडियासाठी ९७ धावा केल्या तर धोनी ९१ धावांवर नाबाद राहिला. दोघांच्या या खेळीमुळे भारताला २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वविजेता बनता आले. (Dhoni-Gambhir)