नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयपीएल 2022 (IPL 2022)साठी बायो-बबलसंदर्भातील नियम आणखी कडक केले आहेत. गतसाली कोरोनामुळे आयपीएल 2021 मधील स्पर्धा अर्ध्यावरच थांबवण्यात आली. त्यानंतर उर्वरित स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्यात आली होती. अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून बीसीसीआयने बायो-बबलसंदर्भातील नियमावली कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये एखाद्या संघाच्या खेळाडूने बायो-बबलच्या नियमाचे उल्लंघन केल्यास त्याला सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. क्वारंटाईन काळात संबंधित खेळाडूच्या संघाचा सामना असेल तर त्या खेळाडूचे सामन्याचे 100 टक्के मानधन दंड म्हणून कापण्यात येणार आहे.
आयपीएल (IPL 2022) संघाच्या एखाद्या खेळाडूने बायो-बबल नियमाचे दुसर्यांदा उल्लंघन केल्यास त्याला सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. याशिवाय त्याच्या एका सामन्यासाठी बंदी घालण्यात येईल.
जर एखाद्या खेळाडूने तिसर्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास त्याला स्पर्धेतून बाहेर व्हावे लागेल. असा खेळाडू त्याच्या फ्रँचाईझी संघालाही मोठे नुकसान पोहोचू शकतो. नव्या नियमांतर्गत फ्रँचाईझीला रिप्लेसमेंटचा पर्याय मिळू शकणार नाही.
दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने यंदाचे आयपीएल सामने मुंबई आणि पुण्यात आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेस 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
स्पर्धेदरम्यान खेळाडूच्या कुटुंबातील सदस्य अथवा संघाचा अधिकारी, सामनाअधिकार्याने एखाद्यावेळी कोविड 19 प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्यास त्याला सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.
आणखी वाचा :