नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : श्री अन्नापासून (भरड धान्य) तयार केलेले दही गोळे, कलौंजी पेरलेले मुंबई पाव, दूध साखर आणि गव्हापासून तयार केलेली वेलचीच्या चवीची मुलायम रोटी, अंजीर पीचचा मुरंबा, काश्मीरी कहवा, दार्जिलिंग चहा…. हा मेन्यू आहे जी–२० शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या परदेशी पाहुण्यांसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या मेजवानीचा. शरद ऋतुतील हवामानानुसार मेजवानीचा मेन्यू तयार करण्यात आला होता. अर्थात, या मेजवानीवर भारतीय आहार संस्कृतीची छाप राखताना परदेशी पाहुण्यांसाठी पूर्णतः शाकाहारी व्यंजने ठेवण्यात आली होती.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी–२० शिखर परिषदेसाठी आलेल्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींपासून ते आफ्रिकी संघाच्या प्रमुखांपर्यंत अशा सर्व पाहुण्यांना राष्ट्रपती भवनात मेजवानी दिली. या मेजवानीसाठी केंद्रीय मंत्री, राज्यपाल आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मेजवानीचा मेन्यू देखील जी–२० परिषदेच्या वसुधैव कुटुंबकम – एक पृथ्वी. एक कुटुंब, एक भविष्य या घोषवाक्याला समर्पीत होता. भारतीय परंपरा, चालीरिती व खाद्यसंस्कृती लक्षात घेऊन आणि शरद ऋतुतील हवामानाला अनुसरून या मेजवानीसाठी मेन्यू तयार करण्यात आला होता. भारतीय पाककलेची वैविध्यता दर्शविणाऱ्या या मेन्यूमध्ये स्टार्टर म्हणून दही गोळे आणि मसालेदार चटणीने नटलेले कुरकुरीत कंगनी श्रीअन्न लिफ क्रिस्प्स त्यानंतर मुख्य भोजनात ग्लेज्ड फॉरेस्ट मश्रूम, कुटकी श्रीअन्न क्रिस्प आणि कढीपत्ते घालून तयार केलेला केरळी लालभात आणि फणसाचे गॅलेट
यासोबतच, भारतीय रोटी मध्ये कलौंजी (कांद्याचे बी) घालून तयार केलेला मुंबई पाव, वेलचीच्या स्वादाची गोडसर बाकरखानी रोटी त्याचप्रमाणे काश्मिरी कहवा, दार्जिलिंग चहा, मुंबई पाव, अंजीर–पीच मुरंबा यासारख्या लज्जतदार पदार्थांची रेलचेल आणि जोडीला गंधर्व अतोद्यं या संगीताच्या सुरांची साथ हे राष्ट्रपतींच्या मेजवानीचे वैशिष्ट्य राहिले. आलेल्या पाहुण्याचे नालंदा विद्यापीठाच्या पार्श्वभूमीवर स्वागत करण्यात आले.