नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार 2050 पर्यंत चीनची लोकसंख्या आणखी कमी होवून 131 कोटी, तर भारताच्या लोकसंख्येत वाढ होवून ती 166 कोटी झालेली असेल. मुंबईची लोकसंख्या 4.24 कोटी झालेली असेल. मुंबई हे जगातील सर्वाधिक गजबजलेले शहर झालेले असेल.
आजमितीस भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाखांवर पोहोचली असून, भारतात आता चीनपेक्षा सुमारे 30 लाख लोक जास्त असले तरी, ही तफावत पुढे विस्तारत जाणार आहे.
लोकसंख्या वृद्धीचा दर आटोक्यात आणण्यात चीन यशस्वी झालेला आहे. भारतात हा दर चढा आहे. चीनचा जन्मदर गतवर्षी होता त्या तुलनेत उणे झालेला आहे. चीनने त्यासाठी बर्याच उपाययोजना, कायदेही केले. भारताने प्रबोधनापलीकडे फारसे काही केले नाही. प्रबोधनाचा परिणामही एका विशिष्ट वर्गावर झाला.
अर्थात 2011 नंतर भारतात जनगणना झालेली नाही. नियमानुसार 2021 मध्ये ती व्हायला हवी होती. कोरोनामुळे ती स्थगित झाली. भारताची या पुढील जनगणना ऑनलाईन होणार आहे. ती झाल्यावर आणखी नेमकेपणाने लोकसंख्येची देशातील स्थिती स्पष्ट होईल.
1981 मध्ये पहिल्यांदा जनगणना झाली तेव्हा भारताची लोकसंख्या 25.38 कोटी होती. यानंतर दर 10 वर्षांनी भारतात जनगणना होऊ लागली.
फेब्रुवारी 2011 मध्ये 15 वी जनगणना झाली. तेव्हा लोकसंख्या 121 कोटींवर होती. 51.54 टक्के पुरुष, तर 48.16 टक्के महिला यात होत्या. देशाची पुढची जनगणना 2021 मध्ये नियोजित होती. ती कोरोनामुळे होऊ शकली नाही. आगामी जनगणना ऑनलाईन केली जाईल, असे मात्र भारत सरकारने जाहीर केले आहे.
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) लोकसंख्याविषयक अहवालातील भारताच्या नकाशात गिलगिट-बाल्टिस्तान (पीओके) तसेच लडाख हे भाग भारतापासून वेगळे असल्याचे दाखविण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीने (यूएनपीएफ) आपल्या अहवालात भारताचा सदोष नकाशा प्रकाशित केला आहे. गिलगिट-बाल्टिस्तानला यात पाकिस्तानचा भाग म्हणून दाखविण्यात आले आहे. लडाखचा चीनच्या ताब्यात असलेला भागही भारताहून वेगळा दाखविण्यात आला आहे. संपूर्ण जम्मू-काश्मीर आणि संपूर्ण लडाख हे आमचे अविभाज्य अंग आहे, अशी भारताची स्पष्ट, अधिकृत भूमिका असताना संयुक्त राष्ट्रांनी हा प्रकार केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
2011 मधील जनगणना 16 भाषांतून झाली होती. 2001 ते 2011 दरम्यान देशातील लोकसंख्येत तब्बल 18 टक्क्यांनी वाढ झालेली होती.