पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav Press : विश्वचषक फायनलमध्ये झालेला पराभव विसरायला वेळ लागेल. असे नाही की तुम्ही दुसऱ्या दिवशी जागे व्हाल आणि सर्व काही ठीक होईल. पण झाल्यागेल्या गोष्टी मागे ठेवून आता पुढे वाटचाल करणे क्रमप्राप्त आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात नवे खेळाडू आहेत. या सर्वांसोबत खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून (23 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. विशाखापट्टणमच्या मैदानावर उभय संघांमध्ये पहिला सामना रंगणार आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादव भारताचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारताच्या नव्या टी-20 कर्णधाराची पत्रकार परिषद पर पडली. यावेळी सूर्याने रोहित शर्माच्या नेतृत्व कौशल्याची प्रशंसा केली. पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या पत्रकाराने ट्विट केले की, सूर्यकुमार यादवच्या पीसीमध्ये फक्त दोनच पत्रकार उपस्थित होते. तर रविवारी वर्ल्डकप फायनलनंतर झालेल्या पीसी दरम्यान 200 हून अधिक लोक होते. मात्र, बुधवारी ही संख्या केवळ दोनपर्यंत मर्यादित होती. जिओ सिनेमाने या पीसीचा व्हिडिओ शेअर केला आहे जो फक्त 3 मिनिटे 32 सेकंदांचा आहे.
सूर्या म्हणाला, 'रोहित शर्माने वनडे वर्ल्डकपमध्ये चमकदार कामगिरी केली. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर त्याने प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवण्याचे काम केले. टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता, मात्र ऑस्ट्रेलियाकडून 6 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न भंगले. हा पराभव नक्कीच जिव्हारी लागणारा आहे.'
'विश्वचषक फायनलमधील पराभव साहजिकच निराशाजनक आहे. तथापि, जेव्हा आपण या प्रवासाकडे मागे वळून पाहता, तेव्हा खरोखरच ही एक मोठी मोहीम असल्याचे तुम्हाला जाणवेल. प्रत्येक खेळाडू, सपोर्ट स्टाफ, संपूर्ण भारत आणि आमच्या कुटुंबियांना आम्ही ज्या प्रकारे मैदानावर खेळलो त्याचा अभिमान वाटतो,' असेही सूर्याने सांगितले. (Suryakumar Yadav Press)
तो पुढे म्हणाला, 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी आम्ही जे काही टी-20 सामने खेळू ते खूप महत्त्वाचे असतील. मी युवा खेळाडूंना सांगितले आहे की, न घाबरता खेळा आणि संघासाठी जे काही करता येईल ते करा. ते आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही असेच करत आले आहेत.' (Suryakumar Yadav Press)