पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India Defeat : ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकून भारताची विजयी मालिका खंडित केली. गेल्या 10 वर्षांतील भारताचा घरच्या मैदानावरील हा तिसरा आणि दोन वर्षांतील पहिला पराभव आहे. 1135 चेंडूपर्यंत चाललेला हा कसोटी सामना भारतीय खेळपट्टीवर खेळला गेलेला सर्वात लहान सामना ठरला असून यात भारताला पराभव पत्करावा लागला. यासह टीम इंडियाच्या नावावर तब्बल 71 वर्षांनंतर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
इंदूरमध्ये कसोटीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 9 गडी राखून विजय मिळवला. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासमोर 76 धावांचे लक्ष्य होते, जे ऑस्ट्रेलियन संघाने उपाहारापूर्वी गाठले. म्हणजेच हा कसोटी सामना अडीच दिवसात संपला.
71 वर्षांपूर्वी घरच्या मैदानावर चेंडूंच्या बाबतीत सर्वात लहान कसोटी सामन्यात टीम इंडियाला 1951-52 मध्ये इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या त्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांनी मिळून एकूण 1459 चेंडूंचा सामना केला. त्या सामन्यात टीम इंडियाला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता कांगारूंनी भारताला केवळ 1135 चेंडूत मात देऊन नवा विक्रम केला आहे. (team india defeat in indore against australia)
1135 चेंडू : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : इंदूर 2022-23
1459 चेंडू भारत विरुद्ध इंग्लंड : कानपूर 1951-52
1474 चेंडू भारत विरुद्ध वेस्ट इंडीज : कोलकाता 1983-84
1476 चेंडू भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मुंबई 2000/01
इंदूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून विजय मिळवत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. अंतिम फेरी गाठणारा तो पहिला संघ ठरला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाच्या अडचणीही वाढल्या आहेत. वास्तविक, डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला विजयाची गरज आहे. अशा स्थितीत भारताला अहमदाबादमध्ये विजयाची नोंद करावी लागेल, अन्यथा संघाला श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड मालिकेवर अवलंबून राहावे लागेल. (team india defeat in indore against australia)
2 वर्षानंतर भारताचा घरच्या मैदानावर हा पहिला पराभव आहे. याआधी 2021 मध्ये टीम इंडियाला घरच्या भूमीवर पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला होता.
इंदूर कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टीम इंडिया 109 धावांवर आटोपली. प्रत्युत्तरात कांगारूंनी पहिल्या डावात 88 धावांची आघाडी घेत 197 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा वगळता भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावातही निराशा केली आणि संपूर्ण संघ 163 धावांत गारद झाला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे लबुशेन आणि ट्रॅव्हिस हेडच्या शानदार फलंदाजीमुळे संघाने 9 गडी राखून पूर्ण केले.