पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील निर्णायक सामना आज (दि.२५) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत मालिका विजयाच्या उद्देशाने दोन्ही संघ मैदानात उतरले आहेत.
मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर १८७ धावांचे आव्हान दिले आहे. कॅमरॉन ग्रीन २१ चेंडूमध्ये ५२ आणि टीम डेव्हिडच्या २७ चेंडूमध्ये ५४ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला १८६ धावा करण्यात यश आले. कॅमरॉन ग्रीन आणि टीम डेव्हिड शिवाय जोश इंग्लिसने २२ चेंडूमध्ये २४ धावा केल्या. आता भारताला मालिका विजयसाठी १८७ धावांची गरज आहे.
पॉव्हरप्ले नंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या संथ झाली होती. यानंतर टीम डेव्हिडने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.शेवटच्या षटकांत डॅनियल सॅम्स आणि टीम डेव्हिड यांनी फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १८६ धावांपर्यंत पोहचवली.
रोहित शर्माचा प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवला आहे. ऑस्ट्रेलियाला १८६ धावांपर्यंत रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले आहे. भारताकडून अक्षर पटेलने ४ षटकांमध्ये ३३ धावा देत ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला संथ केले. तर यजुवेंद्र चहलने ४ षटकांमध्ये २२ धावा देत १ विकट पटकावली. तर भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेलने प्रत्येकी १ विकेट पटकावली.