नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिकमधून शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय करंजकर यांनी अखेर बंडखोरी केली असून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून विजय किसन करंजकर (अपक्ष) यांच्या वतीने रोहिदास किसन करंजकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्या कडे नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे.
नाशिकमध्ये ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केल्याने करंजकर नाराज होते. त्यानंतर वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली व बंडाचा इशाराही दिला होता. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असताना त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नाशिकच्या राजकारणाला आता वेगळं वळण आलं आहे. त्यामुळे ठाकरेंच्या उमेदवारापुढे नव्हे आव्हान निर्माण झाले आहे.
त्यामुळे आता करंजकर यांची बंडखोरी शमवन्याचे आव्हान ठाकरे गटापुढे असणार आहे. त्यामुळे करंजकर माघार घेता की उमेदवारी कायम ठेवता हे पाहावे लागणार आहे.
आज अर्ज दाखल केला असून दोन दिवसात पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मेळावा घेऊन पुढील निर्णय घेऊ. मातोश्रीने भेटीसाठी तीनवेळा बोलावलं पण जायच्या आदल्या दिवशी कॉल करुन आज येऊ नको असे सांगण्यात आल्याचे करंजकर म्हणाले. 35 नगरसेवक आणि 4 जिल्हा परिषद सदस्य सोबत असल्याचा दावा करंजकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट झाली. खूप पूर्वीपासून दोघासोबत कामं करतोय त्यामुळे चांगली ओळख असून ती कायम राहिलं असेही करंजकर म्हणाले.