पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 50 षटकांत सर्व गडी गमावून 273 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी भारताला 274 धावांची गरज आहे. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 130 धावा केल्या. रचिन रवींद्रने 75 आणि ग्लेन फिलिप्सने 23 धावांचे योगदान दिले. या तिघांव्यतिरिक्त केवळ विल यंग (17 धावा) दुहेरी आकडा गाठू शकला. भारताकडून मोहम्मद शमीने पाच आणि कुलदीप यादवने दोन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. डेव्हॉन कॉनवे खातेही न उघडता सिराजचा बळी ठरला. विल यंगही 17 धावा करून शमीच्या गोलंदाजीवर बाद झाला. 19 धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर रचिन रवींद्र आणि डॅरिल मिशेल यांनी न्यूझीलंडच्या डावाची धुरा सांभाळली. पॉवरप्ले संपल्यानंतर न्यूझीलंडची धावसंख्या 2 बाद 34 होती. न्यूझीलंडची धावसंख्या 13 षटकांत 50 आणि 21 षटकांत 100 पार केली. रवींद्रने 56 चेंडूत तर मिशेलने 60 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांच्या खेळीमुळे न्यूझीलंडने 150 धावांचा टप्पा पार केला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडची तिसरी विकेट 178 धावांवर पडली. रवींद्र 75 धावा करून शमीचा दुसरा बळी ठरला.
मिशेलने लॅथमसह न्यूझीलंडची धावसंख्या 200 धावांच्या पुढे नेली. मात्र, लॅथम पाच धावा करून कुलदीपच्या चेंडूवर बाद झाला. मिचेलने 100 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. कुलदीपने फिलिप्सला 23 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आठ धावा करून चॅपमनही बुमराहचा बळी ठरला. शमीने न्यूझीलंडच्या डावाच्या 48व्या षटकात सॅन्टनर आणि मॅट हेन्रीला बोल्ड केले. डावाच्या शेवटच्या षटकात त्याने मिशेलला 130 धावांवर बाद केले आणि सामन्यातील पाचवी विकेट घेतली. शेवटी, किवी संघाला 50 षटकात सर्व गडी गमावून 273 धावा करता आल्या. भारताकडून शमीच्या पाच बळींव्यतिरिक्त कुलदीपने दोन आणि बुमराह-सिराजने प्रत्येकी एक बळी घेतला.