नवी दिल्ली : आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत 65 मॅच झाल्या आहेत. आणि हैराण करणारी गोष्ट म्हणजे फक्त एकच संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरला आहे. गुजरात टायटन्स वगळता अन्य कोणत्याही संघाला प्ले-ऑफमध्ये स्थान पक्के करता आले नाही. स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती संपण्यासाठी फक्त 3 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे आणि 5 सामने बाकी आहेत. प्ले-ऑफमध्ये 3 जागा असून त्यासाठी 5 संघ स्पर्धेत आहेत. या स्पर्धेत अजून 2 संघ आहेत, पण त्यांचे पोहोचणे अशक्य आहे, त्यामुळे त्यांचा विचार होऊ शकत नाही. (IPL Play Offs)
प्ले-ऑफच्या शर्यतीत सर्वात आधी धोनी नेतृत्व करत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा विचार करू. गुणतक्त्यात दुसर्या क्रमांकावर असलेल्या चेन्नईची आज 20 मे रोजी दिल्लीविरुद्ध अखेरची साखळी लढत होणार आहे. प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना या लढतीत विजय मिळवावा लागेल. जर चेन्नईचा पराभव झाला तर त्यांना मुंबई, बेंगलोर, लखनौ या संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. (IPL Play Offs)
लखनौ संघाकडे चेन्नईप्रमाणेच 15 गुण आहेत, पण त्यांचा नेट रनरेट कमी असल्याने गुणतक्त्यात ते तिसर्या स्थानावर आहेत. आज 20 मे रोजी त्यांची लढत कोलकाताविरुद्ध होणार आहे. जर या सामन्यात त्यांनी विजय मिळवला तर लखनौचे प्ले-ऑफचे तिकीट पक्के होईल, पण पराभव झाला तर चेन्नई, मुंबई आणि बेंगलोर यापैकी कमीत कमी एका संघाचा पराभव होणे त्यांच्यासाठी गरजेचे असेल.
आरसीबीला प्ले-ऑफचे तिकीट मिळवायचे असेल तर त्यांना अखेरच्या लढतीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. आरसीबीची अखेरची लढत गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. या लढतीआधी अन्य सर्व संघ त्यांच्या अखेरच्या लढती खेळून झाल्या असतील त्यामुळे आरसीबीला प्ले-ऑफचे तिकीट मिळवण्यासाठी नेमके काय करावे लागेल हे स्पष्ट झाले असेल.
प्ले-ऑफच्या शर्यतीत सर्वात अडचण कोणाची झाली असेल तर ती पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सची होय. मुंबईची अखेरची लढत हैदराबादविरुद्ध आहे. या लढतीत त्यांना फक्त विजय नाही तर मोठा विजय मिळवावा लागेल. जेणेकरून त्यांचे नेट रनरेट चांगले होईल. तसे झाले नाही तर मॅच जिंकून देखील मुंबई स्पर्धेबाहेर होईल. कारण, चेन्नई आणि लखनौ यांच्याबरोबर जर आरसीबीने विजय मिळवला तर मुंबईच्या प्ले-ऑफचा निर्णय नेट रनरेटवर होईल.
राजस्थानचे 14 गुण आहेत, पण ते अधिकृतपणे प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले नाहीत. स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी त्यांना आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्या मोठ्या पराभवाची प्रार्थना करावी लागेल. जेणेकरून त्यांचा नेट रनरेट मुंबई आणि बेंगलोरपेक्षा जास्त होईल. तसे झाले तर या तीन्ही संघांचे प्रत्येकी 14 गुण होतील आणि प्ले-ऑफमधील चौथ्या संघाचा निर्णय नेट रनरेटच्या आधारावर होईल.
याशिवाय कोलकाता आणि पंजाब किंग्ज देखील अधिकृतपणे प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले नाहीत, पण नेट रनरेट इतके कमी आहे की त्यांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळ जवळ अशक्य आहे.
हेही वाचा;