पुढारी ऑनलाईन डेस्क : मान्सून गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात सक्रिय आहे. त्यामुळे या भागातील जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी होत आहे. हवामान विभागाने नुकत्याच दिलेल्या बुलेटीननुसार, हा मान्सून महाराष्ट्रातील काही भागात सक्रिय राहणार आहे. पुढील 3-4 दिवसांत कोकणातील काही भाग आणि मध्य महाराष्ट्राच्या लगतच्या घाट भागात अतिमुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता (Heavy rainfall alert) आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिली आहे. यासंदर्भातील ट्विट हवामान विभाग पुणे केंद्राचे विभागप्रमुख डॉ. के.एस होसाळीकर यांनी केले आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित असून तिची हालचाल वायव्य दिशेला सुरू आहे. दरम्यान याचा प्रभाव कोकणातील घाट क्षेत्रावर देखील दिसून येणार आहे, असे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील ३ ते ४ दिवस कोकणातील काही भाग तसेच लगतच्या मध्य महाराष्ट्रातील घाट भागात एकाकी अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता आहे. यामध्ये पुढील पाच दिवस मुंबई, ठाणे रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा येथील घाट भागात मुसळधार (Heavy rainfall alert) लक्ष ठेवा असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाच्या प्रमाणात देखील वाढ होणे अपेक्षित असून, याठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने म्हटले आहे.
पश्चिम मध्य आणि लगतच्या वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सध्या केंद्रीत आहे. ते हळूहळू उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टवरून वायव्येकडे सरकरण्याची शक्यता आहे. मान्सून सध्या दक्षिणेस सामान्य स्थितीत सक्रीय असून, तो पुढील 2-3 दिवसांत तो हळूहळू दक्षिण कोकण किनाऱ्यापासून उत्तर केरळ असा उत्तर वायव्येकडे (Heavy rainfall alert) सरकेल, असे देखील भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.