कोल्हापूर : जिल्ह्यात झालेल्या विविध अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. हेल्मट न वापरल्याने हे अपघाती मृत्यू होत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रादेशिक परिवहन विभागाने सर्व सरकारी कार्यालये, औद्योगिक वसाहती, मोठ्या संस्था, खासगी कार्यालये यांना पत्र पाठवून विनाहेल्मेट येणार्या दुचाकीस्वारांची नावे आरटीओ कार्यालयाला कळवावीत, असे म्हटले आहे.
त्यामुळे हेल्मेट न वापरणार्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होणार आहे. आठवड्यानंतर दंड केला जाणार आहे. अपघातात दुचाकीस्वारांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण रस्ता सुरक्षेच्या द़ृष्टीने चिंताजनक आहे, त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
हेल्मेट वापरासंबंधी प्रबोधन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय कार्यालयांसह आस्थापनांच्या ठिकाणी दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरावे लागणार आहे. हेल्मेट न वापरणार्यांची तपासणी सीसीटीव्ही फुटेज आधारे करा आणि त्यांच्या नावांची यादी कार्यालयाला कळवा, असे पत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संबंधितांना पाठविले आहे.