पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, उत्तराखंड आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. हवामान खात्याने उत्तराखंड, गुजरातच्या काही भागांमध्ये आज (दि.२२ जुलै) मुसळधार तर मुंबईसाठी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने काल रात्री पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे शहरांमध्ये पुन्हा एकदा जनजीवन ठप्प होण्याची शक्यता आहे.
संततधार पावसामुळे शुक्रवारी मुंबईतील रस्ते बंद, ट्रेन रद्द आणि शैक्षणिक संस्थांना सुटी देण्यात आली. दरम्यान मुंबईतील अनेक भागात पावसाचे पाणी शिरले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईला पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता दर्शविली आहे. तसेच आजही मुंबई शहरासह उपनगराला पावसाने झोडपले आहे. महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये संततधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक भागातील घरे, रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील नांदेडमधील बिलोली तालुक्यातील १० हून अधिक गावांतील सुमारे 1,000 लोकांना पूरसदृश परिस्थितीमुळे सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
बद्रीनाथ महामार्गावरील लांबागड आणि कांचनगंगा या भागात संततधार आणि मुसळधार पावसामुळे कालवा फुटला आहे. यामुळे या भागात वाहतूक कोंडी झाल्याने प्रमुख मार्ग विस्कळीत झाला असून, जनजीवन ठप्प झाले आहे.
भारतीय हवामान खात्याने (IMD) हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि शनिवारी (दि.२२ जुलै) राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 23 ते 25 जुलै दरम्यान येथील चंबा, कांगडा, शिमला, कुल्लू, मंडी, बिलासपूर, सोलन आणि सिरमौर जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारी (दि.२२ जुलै) उना, हमीरपूर, लाहौल आणि स्पिती, मी आणि कश्मीर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.