वारणावती; पुढारी वृत्तसेवा : चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. बुधवारी सकाळी आठ ते गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 24 तासात 55 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. आजअखेर एकूण 1055 मिलिमीटर पाऊस येथे बरसला
आहे. पावसाचा जोर असल्यामुळे धरण 80 टक्के भरले आहे.
पाणीपातळी स्थिर ठेवण्याच्या उद्देशाने काल धरणाचे दोन दरवाजे उघडून 2456 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणाचे उर्वरित दोन दरवाजे पुन्हा उघडण्यात आले आहेत. आता धरणाचे चारही दरवाजे उघडले आहेत. येथून 5150 व वीजनिर्मिती केंद्रातून 1630 असा एकूण 6780 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. वारणा नदीची पाणी पातळी वाढली असून अनेक ठिकाणी ती पात्र बाहेर गेली आहे. परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर वाढल्यास आणखी विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने अनेक नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
धरणात 14 हजार 443 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरण क्षेत्रात पडणारा मुसळधार पाऊस आणि पाणलोट क्षेत्रात येणार्या पाण्याची आवक यामुळे धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली आहे. आज चांदोली धरणाची पाणी पातळी 621.30 मीटर इतकी आहे. धरणात 28.93 टीएमसी पाणीसाठा असून धरण 84.10 टक्के भरले आहे. आज अखेर 1055 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. तर गतवर्षी आजच्या तारखेला एकूण 1292 मिलिमीटर पाऊस पडला होता. गतवर्षीच्या तुलनेत 237 मिलिमीटर पाऊस यंदा कमी
आहे.
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 19.7 मिमी पावसाची नोंद झाली. मिरज तालुक्यात सर्वाधिक 31.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये अशी : मिरज 31.5 (174.4), जत 19.7 (138.4), खानापूर-विटा 15.1 (105.3), वाळवा-इस्लामपूर 12.9 (192.5), तासगाव 21.5 (177.5), शिराळा 21.7 (489.9), आटपाडी 7.5 (108.3), कवठेमहांकाळ 22.4 (149.1), पलूस 21.1 (162.4), कडेगाव 11 (125.9).