कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : शनिवारपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगेची पाणी पातळी १७ फुटावर गेली आहे. बंधाऱ्यावरून यातूनच धोकादायकरित्या वाहतूक सुरू आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात चौथ्यांदा राजाराम बंधाऱ्यावरून पंचगंगेचे पाणी वाहत आहे.
गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दुपारपासून जोरदार सुरुवात केली. आज (दि. ११) सकाळी ११ वाजल्यानंतर धरणाचा सहा नंबरचा स्वयंचलीत दरवाजा खुला झाला. या दरवाजातून १४२८ क्युसेक्स तर विजगृहातून १६०० क्युसेकस असा एकूण ३०२८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे. गेल्या चोवीस तासांत 79 मीमी पाऊस झाला असून जूनपासून आजअखेर 3913 मीमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.