मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहर आणि उपनगरांसाठी पुढील आठवडा अधिक तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. १६ एप्रिलला पारा ३७ अंश सेल्सिअसवर जाण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) सांताक्रुझ वेधशाळेने वर्तवला आहे.
शनिवारी सांताक्रुझ वेधशाळेमध्ये किमान २३ व कमाल ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. रविवारी (२४/३४) त्यात प्रत्येकी एका अंशाने वाढ अपेक्षित आहे. मात्र, सोमवारपासून तापमान प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी किमान तापमान २५ तर कमाल तापमान ३६ अंशावर जाईल. मंगळवारी हे तापमान ३७ अंश सेल्सिअस असेल. त्यानंतर पुढील दोन दिवस कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील, असे वेधशाळेने म्हटले आहे.
शुक्रवार व शनिवारी दुपारपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश व संध्याकाळी ढगाळ वातावरण होते. सोमवारपासून दिवसभर स्वच्छ सूर्यप्रकाश पडणार आहे. त्यामुळे दुपारी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेले आठ दिवस पाऊस व गारपिट सुरु असल्यामुळे यंदा चक्क उन्हाळ्यात विदर्भ, मराठवाड्यातील वातावरण थंड झाले आहे. विदर्भातील कमाल तापमान ३० ते ३३ तर मराठवाड्यातील ३५ ते ३६ अंशांवर खाली आले आहे. उष्णतेची लाट मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र तीव्र आहे. शनिवारी मालेगावचा पारा ४०.४ अंशांवर होता.
हेही वाचा :