कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : Aurangzeb : छत्रपती शिवरायांचा औरंगजेब शत्रू होता. त्यामुळे तो हिंदुस्थानी मुस्लिमांचा शत्रूच आहे. त्याचे उदात्तीकरण होऊ शकत नाही, असे आ. हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी म्हटले आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.
छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. त्यांना मुस्लिम समाजाविषयी कधीच आकस नव्हता. शिवरायांच्या पदरी अनेक मुसलमान सरदार, वतनदार आणि इतर चाकरही होते. शिवरायांच्या सैन्यदलाचा प्रमुख दौलतखान, त्यांचा अत्यंत विश्वासू अंगरक्षक मदारी मेहत्तर, वकील काजी हैदर, सिद्धी हिलाल यांच्यासह शिवरायांच्या सैन्यात अनेक मावळे मुस्लिम होते.
हिंदुस्थान आणि पाकिस्तान, अशी फाळणी झाल्यानंतर भारतमाता हीच आमची आई आहे. या भावनेतूनच हिंदुस्थानी मुस्लिम या मातीत राहिला. सामाजिक विद्वेषातून दंगली घडविणे हा काही लोकांचा अजेंडाच आहे. त्यांच्या अजेंड्याला बळी पडू नका. मुस्लिम समाजाने आपल्या लहान, अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवून त्यांच्या हातून अशा गोष्टी घडणार नाहीत, याचीही दक्षता घावी. औरंगजेब आपला होऊच शकत नाही, हे कायम लक्षात ठेवा, असेही हसन मुश्रीफ म्हणाले.
सावध राहा, बळी पडू नका
धर्मा-धर्मांत तेढ वाढवून समाजात विद्वेष पसरविण्याच्या हेतूने चिथावणी देण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहेत. अशा चिथावणीखोरांपासून सावध राहा. त्यांना बळी पडू नका, असे आवाहनही मुश्रीफ यांनी केले.